प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या, आता जातीभेद संपायलाच हवा

 

विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाष्य केले. “भेदभावाला कारणीभूत असलेल्या सर्व गोष्टी लॉक करून वर्ण आणि जात या संकल्पना मोडीत काढल्या पाहिजे.” असे ते म्हणाले. डॉ. मदन कुळकर्णी व डॉ. रेणुका बोकारे संशोधित ‘वज्रसूची टंक’ या ग्रंथाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

‘वज्रसूची टुंक’ या पुस्तकाचा संदर्भ देत ते म्हणाले, की सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा एक भाग होता, परंतु तो विसरला गेला आणि त्याचे घातक परिणाम झाले. वर्ण आणि जातिव्यवस्थेत मुळात कोणताही भेदभाव नसून त्याचे उपयोग आहेत. सामाजिक भेदभाव मानणाऱ्यांच्या विरुद्ध बोलणारे सर्वच आदर्श चरित्र आहेत. अश्वघोषाने ‘वज्रसूची उपनिषद’मध्ये याच भेदांचा विरोध करणारे सर्व आकलन व संदर्भ प्राचीन भारतीय सनातन वैदिक ग्रंथाच्या आधारे मांडले आहे. परंतु, त्याच शास्त्रांतील तटस्थ विचारांचा आधार घेत फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावून त्याला वेगळ्या गटात नेले.” असे ते म्हणाले.

महाभारत, रामायण, उपनिषदे आदी भारतीय शास्त्रांमध्ये अतिशय तटस्थतेने प्रत्येक विचार प्रस्थापित करण्यात आला आहे. त्यात नायक आणि खलनायकाचे तटस्थ विचार प्रक्षेपित झाले आहेत. परंतु, खलनायकाच्या विचारांवर जोर देऊन इंग्रज व अन्य फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावली आणि हेच भारतीय विचार असल्याचे बिंबवले आणि त्यात संपूर्ण समाज भ्रमिष्ट झाल्याने वाणीविवेक व कृतिविवेकाने पुढे जाणे गरजेचे आहे, असे डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले.

मागील पिढ्यांनी सर्वत्र चुका केल्या असून भारतही त्याला अपवाद नाही. जगभरातील सर्वच समाजात पूर्वजांनी चुका केल्या आहेत. शास्त्र आणि मनुष्य, यात मनुष्य श्रेष्ठ आहे. परंतु, सामाजिक संतुलनासाठी कायदा पाळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कर्तव्यरूपी धर्म पाळणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच धर्म सर्वश्रेष्ठ मानला जातो. संतुलित व्यवहार शिकवण्यासाठीचे कर्तव्य म्हणजेच धर्म होय, असेही त्यांनी सांगितले

Team Global News Marathi: