पोलीस असल्याचे सांगून पुण्यातील भररस्त्यातून तरुण-तरुणीचे अपहरण,८ तासात आरोपींना अटक
पुणे – ऑफिसवरून घरी जाणा-या २३ वर्षीय तरुणी व २७ वर्षीय तरुणाचे एका टोळक्याने आम्ही पोलीस असून पोलीस ठाण्याला जायचं आहे, असं सांगत दोघांचे अपहरण केले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आयसीसी टॉवर, सेनापती बापट रोड येथे घडली.
टोळक्याने त्या दोघांना गाडीत घालून पाषाण मार्गे, चांदणी चौक ते कात्रज घाटापर्यंत नेले.त्याठिकाणी तरुणाला गाडीतून खाली उतरले व तरुणीला बळजबरीने घेऊन पुढे साता-याच्या दिशेने फरार झाले. तक्रारीनंतर पोलिसांनी त्या तरुणीला केवळ ८ तासांत शोधून काढले.
याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी दत्तात्रय रामचंद्र भोईटे (वय ३४,रा. वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा), संदीप किसन जाधव (वय २८, रा.आर्डे, ता.जावळी, जि.सातारा), अक्षय कृष्णा दीक्षित (वय २६ रा.सदर), राहुल बाळासाहेब बरकडे (वय २७, रा.लिंब, ता.जि.सातारा), सागर अनिल कोळेकर (वय २३, रा.मुपो सुरुर, ता.वाई, जि.सातारा), मंगेश राजाराम खंडजोडे (वय १८,रा. लिंब, ता.जि. सातारा), शुभम नवनाथ बरकडे (वय २० रा.सदर), मंगेश रमेश शिंदे (वय २१,रा.सदर), किरण दिलीप बाबर (वय २३, रा.किकली, ता.वाई, जि.सातारा) या सर्व आरोपींनी पोलिसांनी सातारा येथून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि २३ वर्षीय महिला सहकारी सेनापती बापट रस्त्यावरून बोलत जात असताना कारमधून आलेल्या टोळक्याने त्यांना अडवले व मुलीला बळजबरीने धक्काबुक्की केली. तसेच, पोलीस असल्याचे सांगून पोलीस स्टेशनला जायचे आहे, असे सांगून गाडीत बसवले. हे टोळके त्यांना पाषाण मार्गे चांदणी चौक ते बंगळुरु हायवेने कात्रज घाटा जवळ घेवून गेले. या ठिकाणी फिर्यादी तरुणाला त्यांनी गाडीतून खाली उतरवले व मुलीला बळजबरीने साताराच्या दिशेने घेऊन गेले.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दखल घेऊन संबंधित मुलीची साता-यातील शिरवळ येथून सुखरुप सुटका केली आणि संबंधित आरोपींना अटक केली. केवळ आठ तासांत पोलिसांनी या अपहरण केलेल्या मुलीला शोधून काढले. दोन्ही तरूण तरुणी सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.