मुंबई,दि.८ : कोरोनाच्या काळात लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राज्यकर्त्यांना झोप कशी येते ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यसमिती बैठकीच्या समारोप प्रसंगी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आम्ही रस्त्यावर, शेतात जाऊन, समाजात जाऊन काम करणारे.कोरोनाच्या काळात भाजपने हे दाखवून दिले. आमच्यापैकी एकही नेता घरी बसला नाही.हाथरसचा निषेध प्रत्येकाने केलाच पाहिजे.पण महाराष्ट्रातील किती भगिनींबद्दल संवेदना दाखविली ?कोविड सेंटरमध्ये बलात्कार आणि विनयभंग या नित्याच्याच घटना झाल्या आहेत.
किती बलात्कार आणि विनयभंग झाल्यावर तुम्ही नियम (SOP) तयार करणार ते तरी सांगा, मराठा आरक्षणावर आज राज्यभरात संताप आहे. पण राज्य सरकारकडून नुसता वेळकाढूपणा. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी पुन्हा भाजपवर आरोप.या सरकारकडे एकच काम कुणी काही आरोप केला की महाराष्ट्रद्वेष म्हणायचे आणि भाजपवर टीका करून मोकळे व्हायचे.सरकारचे काम आहे प्रश्न सोडविण्याचे,कोकणात वादळ आले, काहीच मिळाले नाही.
विदर्भात पूर आला, तेव्हा राजा ‘उधार‘ झाला.मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने पीकं उद्धवस्त झाली. पण शेतकऱ्याला कवडीची मदत मिळाली नाही….आणि मुख्यमंत्री म्हणतात ‘पिकेल ते विकेल‘.ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे.
आंदोलन करणाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे. कायदेशीर मार्गाने आंदोलन करा. कायदा हाती घेऊ नका.महाराष्ट्र पेटलेला मी अनुभवला आहे.कोरोनाच्या काळात लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राज्यकर्त्यांना झोप कशी येते ? त्यातही सरकार करते तो केवळ भ्रष्टाचार.महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्र नाही.१२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे.
महाराष्ट्राची बदनामी करणारी तर तुमची कृती आहे.
शेती विषयक विधेयक पारित होताच महाराष्ट्राने तातडीने अंमलबजावणीसाठी आदेश काढले.पण मॅडम नाराज होताच नंतर त्याला स्थगिती दिली.आता आपण बांधावर जाऊन, बळीराजाला भेटून सांगू.सामान्य माणूस आज आक्रोशित आहे.
डोळे मिटून दूध पिले, तरी जनतेला हा भ्रष्टाचार दिसतो आहे.
ठरविले होते, की कोरोनाच्या काळात राजकारण करायचे नाही. पण आता भाजपा रस्त्यावर उतरेल,ही कोणती भूमिका आहे? मंदिर नाही, पण मदिरा सुरू! हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा थोडा तरी मान ठेवा.बदला, पण इतकेही बदलू नका,असे ते म्हणाले.