मुंबई : शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रानौत प्रकरणामध्ये शिवसेनाला मोठा झटका दिला. ‘सूडबुद्धीने महापालिकेने कारवाई केली असल्याचे दिसत असून कंगनाला याची नुकसान भरपाई देण्यात यावी.’ असा निर्णय न्यायालयाने दिला. यावरून आता भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
“कंगनाला देण्यात येणार नुकसान भरपाई ही जनतेच्या खिशातून नाही तर आदेश देणाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी” अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
“गेले वर्षभर महाराष्ट्रामध्ये कु – हेतू, वैयक्तिक सूडबुद्धीचे राजकारण सुरु आहे. आता यावर उच्च न्यायालयानेदेखील शिक्कामोर्तब केले आहे. ठाकरे सरकारने वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडले. आता कंगणा रनौत यांना नुकसान भरपाई द्यावी लागली तर कोणाच्या खिशातून? ” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
कंगणा यांच्या विरोधात उभ्या केलेल्या वकिलांवर खर्च झालेले पालिकेचे सुमारे 1 कोटी आणि कंगणा यांनी दावा केलेले 2 कोटी अशी जी काही रक्कम व्हॅल्यूअर ठरवतील ती कोट्यवधीची रक्कम मुंबईकरांच्या खिशातून नको तर आदेश देणाऱ्यांनी स्वतःच्या तिजोरीतून भरावी!!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 27, 2020
पुढे ते म्हणाले की, “कंगणा यांच्या विरोधात उभ्या केलेल्या वकिलांवर खर्च झालेले पालिकेचे सुमारे १ कोटी खर्च केले आहेत. याशिवाय कंगणा यांनी दावा केलेले २ कोटी, ही जी काही रक्कम ठरवतील ती कोट्यवधींची रक्कम मुंबईकरांच्या खिशातून नाही, तर आदेश देणाऱ्यांनी स्वतःच्या तिजोरीतून भरावी.” उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर आता मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकार काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.