मी कोल्हापूरला परत जाईन’ अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आणि अनेकांनी कान टवकारले, डोळे वटारले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर कोल्हापूरला जायचं होतं, मग पुण्यात आलातच कशाला असा सवाल करत ‘एकजण म्हणतो मी पुन्हा येईन, दुसरा म्हणतो मी परत जाईन… पण तुम्हाला बोलावले होते कुणी?’ असा जोरदार चिमटा चंद्रकांत पाटील यांना काढला आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रत्येकालाच सेटल व्हावेसे वाटते, पण मी कोल्हापूरला परत जाणार असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसकडून चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झालेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात, मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलावले नव्हते, असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीस आणि पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मग आले कशाला?
निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच ते परत जाण्याची भाषा करू लागले. लोकांनी पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. कोथरूडची कामे व्हावीत अशी अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापूरलाच थांबायचे होते ना, असे अजित पवार म्हणाले.
..आता कसं वाटतयं गार गार
भाजपचे आमदार संपर्कात असल्याचे मी म्हटलेले नाही. काळजी घ्या. तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली. सरकार येणार नाही, आपली कामे होणार नाहीत यासाठी ते गेले. तिथे कामे होत नसतील ते परत दुसरीकडे जातील. तीन-चार महिन्यांत काही गोष्ट घडू शकतात असे म्हटले तर त्यांना राग आला. इतर पक्षातील आमदार घेताना उकळय़ा फुटत होत्या, बरे वाटत होते. आता कसं वाटतंय… तर गार गार, असा टोला अजित पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला.
मी केंद्राच्या मिशनवर पुण्यात – चंद्रकांत पाटील
मी कोल्हापूरला जाणार म्हणून कोणी हुरळून जाऊ नये वा दुःखीही होऊ नये. केंद्राने मला मिशन दिले आहे ते पूर्ण केल्यानंतरच मी कोल्हापूरला जाणार आहे. हा कालावधी दहा, वीस किंवा पंचवीस वर्षांचाही असू शकतो. सध्या तरी मी येथेच राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. प्रत्येकाला मूळ गाव बोलवत असतं. त्यामुळे आपल्या मूळ गावी सेटल व्हावं असं मला वाटण्यात गैर काय, असा सवालही पाटील यांनी केला.
कोल्हापूरला याच, वाट पाहतोय!
चंद्रकांतदादा, तुम्ही कोल्हापूरला याच. जनता वाटच पाहत आहे, असे म्हणत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना खुलं आव्हान दिलं. पाटील यांचं विधान हास्यस्पद आहे. त्यांनी मेधाताई कुलकर्णी यांच्या हक्कांवर गदा आणत आधी कोथरूडमध्ये घुसखोरी केली. आता परत येणं म्हणजे तेथील मतदारांचा विश्वासघात आहे.
चंपारण्यातील पात्र
चंद्रकांत पाटील हे बूड नसलेलं नेतृत्व आहे. त्यांनी पुण्यात नाही, तर कोल्हापूरमध्ये कुठं तरी स्थिर व्हावं. चंद्रकांतदादा म्हणजे चंपारण्यातील पात्र जे फिरत राहतं, अशी खोचक टीका काँग्रेसचे नेते ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.