शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीबरोबर युती करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उघडपणे जाहीर केल्यानंतर नव्या चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा पुनरुच्चार केला आहे. हल्ली राजकीय पक्षांना स्वबळाचं अजीर्ण नक्कीच झालं आहे.
त्यातच काही दिवसांपूर्वी भाजप म्हणते आम्ही स्वबळावर लढू. भाजप एकटाच आहे. त्यामुळे स्वागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच मुद्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.
स्वबळावर लढून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणं यात चुकीचं काय आहे? भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करत आहेत हे चांगलंच झालं. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचं सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलंच आहे, असं सुचक वक्तव्य सामना अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
यानंतर यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजपने केला आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे. आता त्यांच्या या विधानावर शिवसेना काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.