आता भाजपमध्ये असलेले नेते केवळ आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहेत-जयसिंगराव गायकवाडाचा हल्लाबोल

मुंबई : “एवढ्या वर्षांपासून आम्ही केलं. आंदोलन, उपोषण, किती मेहनत केली. पोलिसांच्या लाठ्या खाल्या. भाजपमध्ये आता जे आहेत त्यापैकी कुणीच नव्हतं. तेच काय त्यांचे बापही नव्हते. बाप म्हणजे आदराने बोलतोय. आता जे आहेत त्यांना विचारा कुणीतरी की, तुम्हाला पोलिसांनी मारहाण केली का, तुम्ही मोर्चा काढला का, उपोषण केलं का? काही नाही फक्त आयत्या पिठावर हे रेघा मारायला आले आहेत. आता मी आलोय साहेब. येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे. ते आता सगळेच बाहेर येणार आहेत”, असा घणाघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जयसिंगराव गायकवाड यांनी केला

जयसिंगराव गायकवाड यांचा आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, अनिल देशमुख, धनंजय मुंडे यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते. यावेळी जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केली

“17 नोव्हेंबरला मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. मान-सन्मान नाही, कामाची कदर नाही, केलेल्या कामाचं कौतुक नाही, चांगल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, अशा पक्षात कोण राहील? गेली 12 वर्ष भाजपसोबत होतो.

राष्ट्रवादी सोडल्याचा मला पश्चात्ताप होतोय. पण आता प्रायश्चित्त करतो आहे. भाजप नेते नितीन गडकरी आमचे मित्र आहेत. पण आज त्यांचीही काय अवस्था आहे हे तुम्हालाही माहिती आहे. एखाद्या कुख्यात अतिरेक्याने भाजपला ताब्यात घ्यावं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे”, अशी टीका जयसिंगराव गायकवाड यांनी केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: