कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा पाठिंबा
मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास ५० दिवसांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. त्यात या कायद्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी जोर्यंत कायदे रद्द करण्यात येणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार अशी हाक शेतकऱ्यांनी दिलेली आहे.
त्यात कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या ५६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर २३,२४ आणि २५ जानेवारी असे तीन दिवस शेतकरी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात शरद पवार हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. शरद पवार यांनी प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्वही पवार यांनी केले होते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे ऐकले पाहिजे. कठोर भूमिका सोडून शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे आणि चर्चेतून हा तिढा सोडवला पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडलेली आहे.