ग्लोबल न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकचे माजी चेअरमन सिताराम गायकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी अजितदादांनी पक्षातील नवीन सदस्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आहे, हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबात तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर आदरणीय पवार साहेबांनी सर्वसमावेशक राजकारण केलं आहे. पवार साहेबांनी सर्व जातीच्या नेत्यांना पक्षात सामील करून सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला एकोप्याने पुढे जायचे आहे, इथे कोणाशीही दुजाभाव होणार नाही, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला. आता पक्षात स्वागत केल्यानंतर आता कुठेही जायचं नाही, असे आवाहन अजित पवार त्यांनी नवीन सदस्यांना केले.
प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपण आपल्याच मालकीच्या घरात आला आहात, असा विश्वास नवीन सदस्यांना दिला. मागील पाच वर्षांत आंदोलनं करूनही कामे झालेली नाहीत, अशी कामे डॉ. लहामटे यांनी करून दाखवली आहेत. यापुढेही अहमदनगर भागातील विकासकामांना गती देण्याचे काम होईल, असे जयंत पाटील म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. या पक्ष प्रवेशावर बोलताना कुटुंबाचा मुलगा रुसून पुन्हा घरी आला की त्याचं स्वागतच होतं असे सांगून सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी सिताराम गायकर यांच्यासमवेत पर्बतराव नाईकवाडी, भाऊपाटील नवले, विठ्ठल चासकर, आप्पासाहेब आवारी, रोहीदास भोर, भाऊसाहेब काळे, प्रकाश नाईकवाडी, दत्तात्रय भोईर, सचिन शेटे, बाळासाहेब भोर यांसोबत अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, आ. बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, संदिप वर्पे, घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.