नामांतराला विरोध करण्यासाठी औरंगाबादमध्ये आज निघणार मोर्चा

 

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी आज शहरात भव्य असा मूक मोर्चा निघणार आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलू नका अशी प्रमुख मागणी यावेळी मोर्चेकरी करणार आहेत. विशेष म्हणजे या मोर्च्यात एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेससह अनेक संघटनेचचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याबाबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. आज दुपारी 2 वाजता भडकल गेट ते आमखास मैदान असा हा मूक मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी मोर्चेकरी आपल्या तोंडावर काळी पट्टी बांधतील. सोबतच हातात तिरंगा घेऊन मोर्चेकरी या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. यावेळी अंदाजे 50 हजार लोकं या मोर्च्यात सहभागी होतील असा दावा नामांतर विरोधी कृती समितीने केला आहे. तर ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा या मोर्च्यात सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नामांतराच्या विरोधात आज काढण्यात येणार असलेल्या मोर्च्याच्या दृष्टीने औरंगाबाद शहर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भडकल गेट ते आमखास मैदान या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस तैनात असणार आहे. तसेच शहर हद्दीतील सर्व पोलीस ठाणे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मोर्चास्थळी तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

तसेच एसीपी-डीसीपी दर्जाचे अधिकारी मोर्च्याच्या प्रत्येक घडामोडीवर स्वतः उपस्थित राहून लक्ष ठेवणार आहे. तसेच पोलीस आयुक्त हे देखील मोर्च्यावर लक्ष ठेवून आहे. गेल्यावेळी एमआयएमकडून काढण्यात आलेल्या मोर्च्यात उडालेला गोंधळ पाहता यावेळी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

Team Global News Marathi: