अनाथांच्या माय ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं पुण्यात दु:खद निधन झालं आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सिंधुताई यांच्यावर महिनाभरापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या.

 

मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.

१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.
त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: