मुंबईकरांनो सावधान! वादळाच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : सध्या अरबी समुद्रात घोंगावत असलेले चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील यंत्रणांना सर्तक झाल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे वादळाची चाहूल लागली असून, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाल्याने घरांसह शेतमालाचे नुकसान झाल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीन दिले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढला आहे. रविवारी पहाटे ४ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणारे हे वादळ दुपारी २ वाजता जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे. त्यामुळे पहाटे ४ ते दुपारी २ या कालावधीमध्ये नागरिकांनी अधिक दक्ष रहावे.” असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी देले आहे.

दरम्यान, दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ तौक्ते गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. शनिवारी सायंकाळी ताशी ३० ते ४० किलोमीटरने वादळ पुढे सरकत होते. हवामाना विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे हे वादळ सध्या मुंबईच्या दक्षिणेला ४९० किमी अंतरावर असून, १८ मे रोजी ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून जाणार असल्याने राज्यात अनेक जिल्ह्याला तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील ५८० रुग्णांना रात्रीतूनच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळाच्या आगमनाआधीच राज्यातील काही जिल्ह्यात वाऱ्याच्या वेग वाढला आहे. तर काही ठिकाणी पावसालाही सुरूवात झाली आहे.

 

शनिवारी रात्री मुंबईत पाऊस झाला. तिकडे कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे नुकसान झाले आहे. इचलकरंजीत शनिवारी रात्री पावसाला सुरूवात झाली. तर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये घरांची पडझड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर, रत्नागिरी तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर गुहागर व दापोली तालुक्यातही संचारबंदी लागू केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास १०४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वाऱ्याचा वेग वाढला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: