राज्यात विशेष करून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात वाढती रुग्णसंख्या पुन्हा एकदा राज्य सरकार आणि मुंबई मनपाच्या चिंतेत भर वाढवणारी आहे. या करून संकटावर मात करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने मेगा प्लॅन आखला आहे.
त्यात पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या एक हजारांहून अधिक इमारती मागच्या दोन दिवसात सील करण्यात आल्या असून, आता इमारतींमधील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या एक हजार ३०५ वर गेली आहे. बंद केलेली करोना केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली असून, दुसरीकडे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवल्या जात आहेत.
सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरु केल्यानंतर तसेच लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्यानंतर १० फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारीत दररोज ३०० पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या सध्या ८००च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.