राष्ट्रीय महाविकास आघाडीसाठी लवकरच हालचाली सुरु, संजय राऊत यांचे सूचक विधान !

 

राज्यात शिवसेना पक्षाने भाजपाशी नातं तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर हात मिळवणी करून महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन केली होती. आता तोच प्रयोग राष्ट्रीय पातळीवर करण्याचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. देशाला एका उत्तम विरोधी आघाडीची गरज आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही आदर्श आघाडी आहे. राष्ट्रीय पातळीवरही अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती सध्या ठीक नाही, पण लवकरच यासंदर्भात हालचाली सुरू होतील, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी दिली.

संजय राऊत शनिवारी शरद पवार यांच्या भेटीला  पोहचले होते होते. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी रविवारी प्रसार माध्यमांना दिली. जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करत आहे, अशाचप्रकारे आघाडी आपण देशात उभी करू शकतो का, यासंदर्भात पवार यांच्याशी चर्चा झाली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जी मुसंडी मारली ती जबरदस्त आहे, पण भविष्यात देशात एक आघाडी निर्माण व्हावी, ही सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी नवीन नेतृत्वच हवे असे नाही, पण एकत्र बसून ठरवायला हवे, असे ते म्हणाले.

 

आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवसेनेने तीन कोविड सेंटर उभारले आहेत. सरकारला समांतर अशी कोविड सेंटर व यंत्रणा राजकीय कार्यकर्तेही उभी करत आहेत. त्यामुळे सरकारचा भार कमी होत आहे. हे इतर राज्यांमध्ये झाले नाही. आता अनेक संघटना, संस्था काम करतात, पण त्यांना शिवसेनेसारखे काम करता आले नाही. आज अनेक राज्यांमध्ये ज्या चिता पेटलेल्या दिसत आहेत, कब्रस्तानात जागा नाही हे चित्र जगात गेले आहे, त्याचे कारण हेच आहे, असे राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: