मोरबी दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू; बचाव कार्यात एनडीआरएफची मदत

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते.या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

दरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आलाय. बचाव कार्यात लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे.

यात आतापर्यंत १७७ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आलीये. रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमकडूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे मेजेर गौरव यांनी दिली.

या घटनेतील जखमींपैकी काही जणांना राजकोटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. तर काही जणांना मोरबी सिव्हील हॉस्पीटल आणि अन्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेय. घटनास्थळी ३० रुग्णवाहिकांनादेखील तैनात करण्यात आलेय. १४० वर्षांहून अधिक जुना असलेला हा पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद होता. ते काम पूर्ण होऊन २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

Team Global News Marathi: