राज्यात शिवसेना पक्षाने भाजपाची साथ सोडल्यानंतर येणाऱ्या महानगर पालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीला मनसे-भाजपा युती होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. तसेच शिवसेनेनं साथ सोडल्यापासून एकाकी पडलेला भाजप आणि राज ठाकरेंनी हाती घेतलेला प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा यावरून भाजप- मनसेच्या युतीचा विषय अनेकदा चर्चेत येतो.
पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष याबद्दल चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरेंना नाशिकमधील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. भाजप-मनसे युती होणार का, असा प्रश्न राज यांना विचारला गेला. त्यावर राज यांनी मला माहीत नाही, असं उत्तर दिलं. ‘युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स समजत नाही. अशा युतीच्या चर्चा सुरू असतील. पण त्या चर्चांबद्दल मला माहीत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
सीडीएस बिपीन रावत यांचा गेल्या आठवड्यात अपघाती मृत्यू झाला. तो अपघात होता की घातपात असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. घातपात की अपघात यावर संशय आहे. मात्र घातपात आहे असं समजलं तरी ते बाहेर येणार आहे का?, असा प्रतिप्रश्न राज यांनी केला. या देशात प्रश्न उपस्थित होतात. पण त्यांची उत्तरं मिळत नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं.