आमदार प्रसाद लाड म्हणाले, वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, संजय राऊतांनी काढली 3 शब्दात इज्जत

आमदार प्रसाद लाड म्हणाले, वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, संजय राऊतांनी काढली 3 शब्दात इज्जत

शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र जास्त काहीही न बोलता संजय राऊतांनी या प्रकरणावर ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’, असं म्हणत केवळ तीन शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत काढली.

 

मुंबई : वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. प्रसाद लाड यांच्या याच वक्तव्याचा शिवसेना नेते चांगलाच समाचार घेत आहेत. अशावेळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र जास्त काहीही न बोलता संजय राऊतांनी या प्रकरणावर ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’, असं म्हणत केवळ तीन शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत काढली.

काय म्हणाले संजय राऊत?

वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना नेते-कार्यकर्ते-पदाधिकारी लाड यांचा निषेध व्यक्त करत जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत. आज सकाळी राऊतांना पत्रकार परिषदेत याचविषयी विचारलं असता, त्यांनी प्रसाद लाड यांना महत्त्व न देता त्यांना अनुल्लेखाने मारलं.

वेळ आली तर सेना भवन फोडू असं प्रसाद लाड म्हणाले, आपण काय म्हणाल?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊत यांनी ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’ एवढ्याच तीन शब्दात लाड यांची इज्जत काढली.

गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?, असं ट्विट करत लाड आणि नितेश राणे यांच्यावर राऊतांनी बोचरी टीका केली.

नितेश राणे गांजा पिऊन बोलतो

शिवसेना भवन हे कलेक्शन भवन झालंय, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्याही टीकेला राऊतांनी उत्तर दिलंय. काही माणसं गांजा पिऊन बोलतात, त्यांच्याकडे कुठं लक्ष द्यायचं…, असं राऊत म्हणाले.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजींच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “तुमची आमची ह्यांना एवढी भीती वाटते की आपण माहिमध्ये आलो तरी ह्यांना वाटतं की हे सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.

प्रसाद लाड यांची कोलांटउडी!

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या. परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचं कुठलंही कारण नाही. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही.

ग्लोबल न्युज नेटवर्क: