तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या काळात गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. अनेक कामगारांना घरे कशी मिळतील त्यांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेण्यात आल्या होत्या तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.
मात्र, आघाडी सरकार आल्यापासून मागच्या वर्षभरापासून सर्वकाही ठप्प आहे. याच वेगाने जर काम सुरू राहील तर सर्वच गिरणीकामगारांना घरे मिळतील माहिती नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविले आहे. ते कोल्हापुरात काल पत्रकार मद्यमांशी बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले की, आजही अनेक गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत. आमच्या सरकारच्या कार्यकाळात अनेकांना घर मिळाली. घरे मिळताना काही अडचणी होत्या त्या सुद्धा जाणून घेऊन त्या सोडवण्यात आल्या. मात्र, आत्ताच्या सरकारने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मी स्वतः एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. माझ्यासारख्या अनेकांनी ठरवले आपल्याला गरज नाही. त्यामुळे आपण घरे मागायची नाहीत.
मात्र, अनेकांना आजही घरांची गरज आहे. त्यामुळे सरकारने नेमके कशावर काम करायचे ठरवले आहे, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. सरकारने वीज बिलाचा विषय असो किंवा शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा विषय असो सगळीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडेही लक्ष देऊन त्या कामगारांना घरे देण्याची गरज आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.