कोरोनाशी लढताना मानसिक सुदृढता जास्त महत्वाची…..
सध्या covid-19 या विषाणूच्या महामारीने अनेक देशांना घेरून टाकले आहे. यातील मुख्य संकट आहे ते शारीरिक आजाराचे, आणि दुसरे आहे यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचे, तिसरे प्रमुख संकट आहे मानसिक आरोग्याचे. पहिल्या दोनीही संकटावर सर्व यंत्रणा प्रामुख्याने काम करत आहेतच, परंतु तिसर्या समस्येवर मात्र अगदी नगण्य अथवा तुटपुंजी म्हणता येईल एवढीच यंत्रणा हाताशी असल्याने ती थोडीशी दुर्लक्षित होत आहे.
मुळात कोरोनामुळे निर्माण झालेल्या शारीरिक आजाराची तीव्रता ही फक्त मानसिक आरोग्याच्या वाईट स्थिती मुळे काही पटीने जास्त तीव्र होऊ शकते. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे सर्वांनीच प्राधान्याने व हेतुपूर्वक लक्ष दिल्यास कोरोना या शारीरिक आजाराशी आपण प्रभावीपणे यशस्वी लढा देऊ शकतो.
सध्या कोरोनाने जेवढे थैमान जगभरात घातले आहे त्यापेक्षा कैक पटीने जास्त थैमान आपल्याकडे यावरच्या बातम्यांनी घातले आहे. अशा बातम्या सतत पाहून तसेच व्हाट्सअप व इतर सोशल मीडियावर इम्युनिटी वाढविण्यावर सुचविलेले भरमसाठ उपाय व काढे पाहून सामान्य माणूस भांबावून गेला आहे. आणि त्यामुळे कोरोना नावाचा शारीरिक आजार त्याला होण्याआधीच तो असंख्य मानसिक आजारांनी ग्रस्त झालेला आहे.
जे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होते, ज्यांना सध्याच्या नोकरीवरून लगेच हात धुवावा लागला अथवा लागणार आहे, अशातल्या काही जणांना या लॉकडाऊन कालावधीत औदासीन्य म्हणजेच डिप्रेशन हा आजार झालेला आहे.
या कालावधीत काही जणांचे उद्योगधंदे बंद पडले, कित्येक जणांचे उत्पन्न बंद पडले. त्यामुळे मुलाबाळांच्या शिक्षणाची फीस पासून ते दैनंदिन गरजा भागविण्याची त्यांची चिंता धोकादायक पातळीच्या पलीकडे गेल्यामुळे पॅनिक डिसॉर्डर या आजाराला काही जण बळी पडत आहेत.
एखाद्या दिवशी सहज थोडासा खोकला आला, अथवा घसा जरी चुकून खाकरला गेला, काही कारणांनी थोडीशी शिंक आली, चिंतेमुळे अंग थोडेसे गरम होऊन ताप आल्यासारखे वाटले तरी काही जणांना मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे आज स्वतःला कोरोना झाला की काय अशी भीती वा भास विनाकारण रोज वाटली जात असल्याने फोबिया या आजाराने ते ग्रासले गेले आहेत.
व्यसन हा देखील एक तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार आहे.
प्रत्यक्षात ज्यांना कोरोना हा आजार झालेला आढळून आला, त्यापैकी काही जणांना लगेच विनाकारण अस्वस्थ वाटायला चालू होते. मोठे पैसेवाले असलेल्यांना मृत्यू आला आहे हे टीव्ही वरील बातम्यांत पाहून मग आपले काय होणार अशी भीती मनात घर करून बसते. आजार झाल्यानंतर काही जणांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास हा होतोच पण असे होताना कित्येकांमध्ये आपण आता जगतो की मरतो अशी भीती विनाकारण वाढीला लागत आहे.
मन चिंती ते वैरी न चिंती* या उक्ती प्रमाणे फक्त कोरोना झालाय एवढे समजताच अनेक नकारात्मक विचार, भीती, अस्वस्थता, काळजी या सर्वांनी मनात थैमान घातल्याने चिंता ( अँक्झायटी ) आजाराची तीव्रता अनेक पटीने वाढत आहे.
कोरोना झाल्यानंतर काही जणांनी मानसिक ताण असह्य झाल्याने दवाखान्यातून पळून जाणे, लपून बसणे, आत्महत्या करणे असे टोकाचे पाऊल देखील उचलले आहे.
या मानसिक आजारांवरील वरील काही उपाय म्हणजे, टीव्हीवर कोरोना विषयीच्या बातम्यांचे विश्लेषण पाहून कित्येकांच्या मनात ज्या नकारात्मक भावनांमध्ये वाढ व भीती निर्माण होत आहे, त्यासाठी या माध्यमांवरील बातम्यांबाबत किमान काही नियमावली तयार करून, त्याची अंमलबजावणी सुरू करणे आवश्यक आहे.
याच बरोबर, जसे शारीरिक आरोग्याच्या सुविधा पुरविले जातात तसेच मानसिक आरोग्याच्या सुविधा देखील पुरविणे आवश्यक आहे. सरकारी पातळीवर ही सुविधा प्रत्येकाला पुरविणे सध्या अवघड असल्याने, किमान सामुदायिक पातळीवर तरी सर्व ठिकाणी अशा सुविधा पुरविण्याचे नियोजन व्हावे.
वैयक्तिक पातळीवर देखील सर्व जण जसे मास्क, शिल्ड, स्वच्छता, योग्य आहार आदीची काळजी घेत आहेतच, परंतु त्यासोबतच मानसिक स्वास्थ्यासाठी काही उपाय करणे देखील आवश्यक आहे, जसे की घरीच व्यायाम, प्राणायाम, ध्यान, शरीर शिथिलीकरण, योगनिद्रा, कुटुंबीयांशी सुसंवाद, घरातच विविध खेळ, पुरेशी शांत झोप, आळस झटकून दिवसभराचा योग्य शेड्युल ठरविणे, गाणी, पेंटिंग आदी छंद जोपासणे वैगेरे._
ही जागतिक महामारीची लाट ओसरेपर्यंत सर्वांना त्रास होणारच हे लक्षात घेणे आवश्यक असून, हा आजार झालाच तर या आजाराचं स्वरूप समजावून घेऊन निर्धाराने व सकारात्मक विचाराने त्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. आजारी व्यक्तीला इतरांनी हसत-खेळवत व तणावमुक्त ठेवावे लागेल. मनातील विवेकी विचार हीच सर्वात मोठी शक्ती असल्याने त्याला ताब्यात ठेवत वरील सर्व उपाय करावे लागतील. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावे लागेल. म्हणतात ना मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण….
आपल्याला किंवा आपल्या परिचितांना अशा परिस्थितीत मनात आलेल्या चिंता, भीती, उदासीनता, ताणतणाव, मानसिक आजार, व्यसन यावर आवश्यकते नुसार त्वरित मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन त्यांच्याकडून समुपदेशन व औषधोपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
चला तर मग आपण सर्वजण मिळून कोरोना या महामारीला अतिशय निर्धाराने सामोरे जाऊन, सकारात्मक व विवेकी विचारांनी आपल्या सर्वांचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवूया व या संकटांवर यशस्वी मात करूया।