‘मी निष्कलंक, आतापर्यंत मी शांत होतो, पण यापुढे…’, – संजय राठोड

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते, महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांनी अखेर त्यांच्यावरील गंभीर आरोपांवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे राठोडांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. पण गेल्या दीड वर्षात पोलिसांच्या झालेल्या तपासात त्यांना क्लीन चीट मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केला होता. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना विरोध केला होता.

तसेच विविध स्तरावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. अखेर या टीकेवर संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. यावेळी राठोड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आपल्यावर अशाप्रकारे आरोप यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. एवढ्या दिवसांपासून आम्ही गप्प होतो. पण यापुढे कायदेशीर पाऊल उचललं जाईल, असे संकेत राठोडांनी दिले. “मी भटक्या, विमुक्त आणि मागासवर्ग समाजातून येतो. मी चारवेळा विधानसभेतून मोठ्या मताने निवडून येतो तेव्हा मला मंत्रीपदाची शपथ मिळाली.

मागच्या सरकारमध्येही मी मंत्री होतो. पण एक घटना घडली त्यावरुन माझ्यावर गंभीर आरोप झाले. ती घटना झाल्यानंतर नैतिक जबाबदारी समजून मी आरोपांची नि:पक्ष चौकशी झाली पाहिजे, ही भूमिका घेवून मी स्वत: राजीनामा दिला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन मला क्लीन चीट दिली. तसेच पोलिसांनी सर्व बाबी मांडल्या आहेत”, अशी भूमिका संजय राठोडांनी मांडली.

Team Global News Marathi: