एकनाथ शिंदे विरोधात उद्धव ठाकरे असा सत्ता संघर्ष पेटलेला असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची एन्ट्री झाली आहे. राज्यपालांनी केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाला पुरेशा संख्येत सज्ज ठेवण्याची मागणी केलीय. काही बंडखोर आमदारांचे कार्यालय आणि घराची तोडफोड केली त्यावेळी राज्य पोलीस शांतपणे पाहात होते,असा आरोप राज्यपालांनी या पत्रात केला आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी 25 जून रोजी हे पत्र लिहलं आहे. या पत्रात शिवसेनेचे 38, प्रहार जनशक्ती पक्षाचे 2 आणि 7 अपक्ष आमदारांचे आपल्याला निवेदन मिळाले असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. या सर्व आमदारांनी त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा अवैध पद्धतीनं काढून घेतल्याची तक्रार आपल्याकडं केली आहे, असे राज्यपालांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.
‘आपण यापूर्वीच आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुरेशी सुरक्षा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही काही आमदारांच्या कार्यालय आणि घराची तोडफोड करण्यात आली तेव्हा पोलीस मूकदर्शक होती. त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाची पुरेशी व्यवस्था करावी आणि त्यांना सज्ज राहण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी राज्यपालांनी केली आहे.
सध्या 15 आमदारांना Y प्लस सुरक्षा शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. या गटातील 15 आमदारांना Y प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे.सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या फोटोला काळं फासलं आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलनही केलं गेलं आहे यानंतर केंद्राने आमदारांच्या कुटुंबीयांना सीआरपीएफ सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.