मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाकरे सरकारनं प्रार्दुभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. राज्यातील कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून प्रसार रोखण्यासाठी आपत्कालीन कायद्यातंर्गत सरकारने १ मे सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. याबाबत सरकारकडून अध्यादेश काढून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
गर्दीमुळे चिंता
महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊन म्हणावा तेवढा कठोरपणे पाळला जात नाही, असे अनेक जिल्ह्यात दिसत आहे. सकाळच्या वेळी भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी काळजी निर्माण करत आहे. त्यामुळे आहे तो लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवा, शिवाय तो आणखी कठोरपणे अंमलात आणा, अशा सूचना एकमताने सर्व मंत्र्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्या. पोलिसांनी थोडा संयम कमी करून मोकाट फिरणाऱ्यांना बंधने आणली पाहिजेत. जाब विचारला पाहिजे, अशा सूचनाही काही मंत्र्यांनी केल्या होत्या.
काय राहणार सुरू आणि काय बंद?
राज्यात आता सर्व किराणा, भाज्यांची दुकानं, फळ विक्रेते, डेरी, बेकरी, सर्व प्रकारची खाद्य दुकानं (चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी), कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व दुकानं आणि शेती संबंधिची दुकानं, पाळीव प्राण्याची खाद्य दुकानं सकाळी ७ ते सकाळी ११ अशा केवळ चार तास सुरू ठेवता येणार आहेत.
Maharashtra government extends current COVID19 restrictions till May 15 pic.twitter.com/TaE6hCJoIV
— ANI (@ANI) April 29, 2021
वरील सर्व दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाला संबंधित क्षेत्रातील परिस्थिती पाहून दुकांच्या वेळांबाबत निर्णय घेता येणार आहे.
काय राहणार बंद?
राज्यात १५ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असलेले इतर कडक निर्बंध हे कायम असणार आहेत.
राज्यातील सर्व सलून, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील
शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद राहतील
क्रीडा संकुलं आणि स्टेडियम देखील बंद राहणार
धार्मिक स्थळं बंदच राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांना देखील परवानगी नाही.
विवाहासाठी केवळ २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी
अंत्यसंस्कारासाठी केवळ २० माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी
सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील