आषाढी प्रमाणे कार्तिकी यात्रा ही भरणार नाही ; पंढरपुरात उद्यापासून चार दिवस संचारबंदी

पंढरपूर :  – सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत कार्तिकी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. परिणामी, कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकऱ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी यात्रा भरून न देण्याचे शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, श्री विठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी २२ नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार, किरण अवचट, प्रशांत भसमे उपस्थित होते.

पंढरपूर शहर व शहरालगतच्या दहा किलोमीटर परिसरामध्ये व १० गावांमध्ये संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. मात्र, शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितलं.

त्यानुसार भाविकांना पंढरपुरात न येऊ देण्यासाठी अठराशे पोलिसांचा बंदोबस्त जिल्हा व पंढरपूर शहर परिसरात लावण्यात आला आहे. तसंच, पंढरपूरकडे येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी झाली आहे. त्याचबरोबर २२ ते २६ नोव्हेंबरपर्यंत एसटी बंद राहणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: