मी काम करणारा मुख्यमंत्री आहे. जे काम करत नव्हते त्यांनाही मी कामाला लावलं आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ही सरकार आहेत.आनंद दिघे यांनी राज्यासाठी खूप काही केलं. त्यांचे कार्य कोणीही विसरू शकत नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले. ठाण्यातील छटपूजेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. लवकरच अयोध्येला जाणार असल्याची घोषणा देखील यावेळी मुख्यत्र्यांनी केली.
काल देशभरात ठिकठिकाणी छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातही पूजेसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. गणपती उत्सव, दिवाळी हे मोठे सण साजरे झाले. आता छटपूजा जोरात होत आहे. अशा कार्यक्रमांमधून अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी शिंदेंनी हिंदीमध्ये संवाद साधल्याचे पाहायला मिळाले.
कलम ३७० हटवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात झालं. अयोध्येतील राम मंदिराचे कामही सुरु आहे,लवकरच आम्ही देखील अयोध्येला जाणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली. यावेळी जय श्रीरामच्या जोरदार घोषणा उपस्थितांनी दिल्या. यावर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.