पुणे :शासनाच्या आवश्यक परवानग्या नसताना थंड पाण्याच्या जार ची निर्मिती-विक्री करणाऱ्या महाराष्ट्रातील बेकायदेशीर थंड जार पाणी निर्मिती उद्योग (चिल्ड वॉटर जार युनिट्स ) बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळाने दिले आहेत.
राष्ट्रीय हरित प्राथिकरणात दाखल केलेल्या याचिकेवर १९ जुन २०२० रोजी झालेल्या निर्णयाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे(आयएएस)यांनी याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश काढला आहे. बेकायदेशीर थंड जार पाणी निर्मिती उद्योग (चिल्ड वॉटर जार युनिट्स )बंद केले जावेत यासाठी महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात धाव घेतली होती.
विजयसिंह डुबल यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे ही माहिती दिली. डुबल यांच्या वतीने एड.असीम सरोदे यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात काम पाहिले. यापूर्वी शासनाच्या आवश्यक परवानग्या नसताना थंड पाण्याच्या जारची निर्मिती-विक्री करणाऱ्या थंड पाण्याचे जार निर्मिती क्षेत्रातील,महाराष्ट्रातील बेकायदेशीर उद्योगांची (चिल्ड वॉटर जार युनिट्स ) माहिती संकलित करण्याचे आदेश राज्य शासनाने राज्यातील. नगरपरिषद,नगरपंचायती आणि महानगरपालिकांना दिले होते. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक भालचंद्र बेहेरे यांनी हा शासकीय आदेश २२ जुलै रोजी काढलेले आहेत.