कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो ही खुळी कल्पना ; सुषमा अंधारेंचा शिंदे सरकारला इशारा

 

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यानिमित्त त्या राज्यभर दौरा करत असून जळगावमध्ये मात्र त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवल्याचा आरोप शिंदे सरकारवर केला आहे. बाई समजून हलक्यात घेऊन नका. मी लढणार आहे. मी महिला म्हणून अजिबात व्हिक्टिम कार्ड खेळणार नाही. मी महाप्रबोधन यात्रा पूर्ण करून दाखवणार आहे.” असे त्या म्हणाल्या.

“माझी सभा नाकारण्याचे कारण मला शेवटपर्यंत कळले नाही. कारण माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा कुणाचा तक्रार अर्जही आलेला नव्हता. हा फक्त मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार आहे. सभेची वेळ संपेपर्यंत मी हॉटेलमधून बाहेर पडणार नाही, याची काळजी घेण्यात आली. मी कदाचित जोरजबरदस्ती करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकले असते. पण त्यामुळे भाजपला किंवा गुलाबराव पाटलांना जे अपेक्षित होते की यातून गोंधळ व्हावा, ते मला टाळायचे होते. मला त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकायचे नव्हते. आपण कायद्याचा आदर करणारे लोक आहोत. मी मग हॉटेलमधूनच ऑनलाईन सभा घेतली.” असे त्यांनी सांगितले.

अंधारे यांनी राज्य सरकारसोबतच देवेंद्र फडणवीस, गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली. “सभेसाठी परवानगी नाकारणे हा केविलवाणा प्रकार होता. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो ही खुळी कल्पना आहे. तुम्ही अशा प्रकारे आवाज दाबून ठेवू शकत नाही. सत्ताधाऱ्यांनी कितीही अडथळे आणले, तरी महाप्रबोधन यात्रा पूर्ण करणारच. हे सगळं केल्यावर मी घाबरेन, असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत.” असे त्या म्हणाल्या.

 

Team Global News Marathi: