‘खोकेवाल्या गद्दारांनी निर्लज्ज प्रकार केला पण..’; चिन्ह गोठवल्यानंतर आदित्य ठाकरेंचा संताप

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. यावरुन आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील नेत्यांना खोकेवाले गद्दार म्हणत फटकारलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की ‘खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे.महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने!’ केंद्रीय निवडणूक आयोगायच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधत आपला संताप व्यक्त केला आहे. खोकेवाल्या गद्दारांनी शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला असल्याची जहरी टीका आदित्य यांनी केली आहे.

दरम्यान रोहीत पवार यांनीही या निर्णयावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही, असं म्हणत रोहीत पवार यांनीही एकनाथ शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: