खासदार भावना गावळी यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

 

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत बंडखोर खासदार भावना गवळी यांच्यावरही निशाणा साधला. “आपल्या पलिकडच्या ताई तुम्हाला माहिती आहेत. शिवसेनेने त्यांना अनेकदा खासदार केले. मात्र, या ताईंना धमक्या देण्यात आल्या. मुंबईहून इकडे दलाल पाठवण्यात आले. त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक झाली; पण ताई मोठ्या हुशार निघाल्या. ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली.


तो राखी बांधल्याचा फोटो छापून आला. फोटो छापून आल्यावर ताईंवर कारवाई करण्याची ईडी-सीबीआयवाल्यांमध्ये हिंमत आहे का? तिकडे गेल्यावर त्यांना सर्व आरोपांपासून संरक्षण मिळाले.” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी पंतप्रधान मोदींना अनेक वर्षांपासून राखी बांधत असल्यामुळे कोणीही यावरून राजकारण करू नये.” असे त्या म्हणाल्या.

“मी यापूर्वीही माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी पंतप्रधान मोदींना अनेक वर्षांपासून राखी बांधत असल्यामुळे यावरून कोणीही राजकारण करू नये. हे मी यापूर्वीही सांगितले आहे. पंतप्रधान मोदींप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही मी दरवर्षी राखी पाठवते. माझ्यावर जे आरोप करण्यात आले होते, त्या प्रकरणी मला न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संजय राऊतांनाही न्यायालयानेच दिलासा दिला आहे. त्यामुळे कोणीही न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढू नये.” असे त्या म्हणाल्या.

 

Team Global News Marathi: