खालापूर ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची घटना: 50हून अधिक जण अडकल्याची भीती

रायगड खालापूर तालुक्यातील इर्शाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्य सुरु आहे. या दुर्घटनेने माळीण दरड दुर्घटनेच्या भयंकर आठवणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी असून दरड येथील रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे इथे असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 90% वाडी ढिगाऱ्याखाली गेली आहे. 30 ते 35 आदिवासी घरांची मोठी वस्ती होती. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे. जवळपास 50हून अधिक लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. तर एका महिलेसह दोन लहान मुलांना वाचविण्यात बचाव कार्य पथकाला आतापर्यंत यश आले आहे. वर अजूनही माती पडत असल्याने बचावकार्य करणाऱ्यांनाही धोकाच निर्माण झाला आहे.

डी.सी. दत्तात्रय नवले आणि डी.सी. सर्जेराव सोनवणे यांना अनुक्रमे वैद्यकीय मदत, बचाव आणि निवारा व्यवस्था ऑपरेशन्ससाठी ओएसडी म्हणून नियुक्त केले आहे. घटनास्थळी चार रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. आरएच चौकात तालुका आरोग्य अधिकारी आणि चार डॉक्टरांसह चार रुग्णवाहिका सज्ज आहेत. खाजगी डॉक्टरांचीही मदत टीएचओ ने बोलावली आहे. एकूण 40 ते 45 घरांची वाडी या दरडीखाली अडकल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून 30 ते 35 घरांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आहे.

घटनास्थळी युद्ध पातळीवरती मदत पथक पोहोचली आहेत. मात्र, सोसाट्याचा वारा तसेच, वरून अद्यापही काही दगड खाली येत आहेत. यामुळे बचाव पथकालाही धोका निर्माण झाला आहे. पण, जे अडकले आहेत त्यांना तातडीने रेस्क्यू करून वाचवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफचे पथक सुद्धा घटना स्थळी पोहोचले आहे.

Team Global: