करवीर नगरीत शिवसेनेला आणखी एक धक्का, हा माजी आमदार शिंदे गटात करणार प्रवेश

 

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची पावले भाजपच्या दिशेने पडत असल्याची चर्चा आहे. अद्याप त्यांनी अजूनही मूळच्या शिवसेनेला राम राम केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही झेंडा खांद्यावर घेतलेला नाही; परंतु मतदारसंघातील संभाव्य राजकीय कोंडी टाळण्यासाठी त्यांना भाजपचा पर्याय जास्त योग्य वाटत असल्याचे समजते. तूर्त त्यांचा पवित्रा ‘ठंडा करके खावो..’ असा आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र यावेत, अशी त्यांची भूमिका आहे; परंतु आजच्या घडीला ते संभवत नाही.

करवीर मतदारसंघातून नरके हे दोन वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले आहेत. त्यांचा मतदारसंघात पारंपरिक विरोधक काँग्रेस आहे. नरके गट म्हणून स्वत:ची राजकीय ताकद, नवे तरुण नेतृत्व, दांडगा लोकसंपर्क आणि शिवसेनेचा आक्रमकपणा अशी मोट बांधून त्यांनी विजय खेचून आणला. हा मतदारसंघ काय शिवसेनेचे पॉकेट नाही हे खरे असले, तरी नरके यांना विजयी करण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची व भगव्या झेंड्याची मोठी मदत झाली आहे, हे पण नाकारता येत नाही; परंतु तरीही ते शिवसेना सोडून अन्य पर्याय शोधत आहेत

विधानसभेच्या निवडणुकीशी कुंभी-कासारी कारखान्याचे राजकारण व अर्थकारणही जोडले गेले आहे. या कारखान्याला पॅकेजची आवश्यकता आहे. भाजपमध्ये गेल्यास केंद्र सरकारच्या मदतीने काही पॅकेज मिळवणे शक्य होईल, असाही हेतू आहे. शिंदे गटाचे कोल्हापूरचे नेतृत्व आता माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे आहे. त्यांचा करवीर मतदारसंघाशी काहीच संबंध नाही. खासदार संजय मंडलिकही शिंदे गटात आहेत; परंतु तेच भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा व विधानसभा एकत्रच झाल्यास कमळ व मोदी यांच्या लोकप्रियतेचा लाभ होऊ शकतो असेही गणित मांडले जाऊ लागले आहे.

Team Global News Marathi: