‘जय श्री राम म्हणणारे राक्षस आहेत’, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान !

 

नवी दिल्ली | काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन वाद सुरू झालेला असताना त्यातच आता काँग्रेसचे आणखी एक नेते रशीद अल्वी यांच्या वादग्रस्त विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. उत्तर प्रदेशातील संभल येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी श्रीरामाच्या नावावरुन भाजपवर निशाणा साधला.

यावेळी काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी रामायणाचा एक प्रसंग सांगताना त्यांनी ‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांची तुलना राक्षसाशी केली. अल्वी म्हणाले, ‘जय श्री रामचा जप करणारे सर्व ऋषी नाहीत, ते राक्षस आहेत. आपल्याला सावध राहण्याची गरज आहे.’ तसेच आपल्या भाषणादरम्यान रशीद अल्वींनी भाजपच्या काही लोकांकडे बोट दाखवत जय श्री रामचा नारा देणाऱ्यांची तुलना रामायणातील कालनेमी राक्षसाशी केली.

ते म्हणाले की, लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध पडले होते, तेव्हा वैद्याच्या सांगण्यावरुन हनुमान हिमालयातून संजीवनी औषध आणण्यासाठी जात होते. त्यावेळी जमीनीवरुन राक्षस जय श्री रामचा जयघोष देत होते. हे ऐकून हनुमानजी खाली आले. हनुमानाचा मौल्यवान वेळ वाया घालवण्यासाठी त्या राक्षसाने हनुमानाला स्नान करायला पाठवले होते. त्या राक्षसाप्रमाणे काही लोक आजही भगवान श्रीरामाचे नामस्मरण करत आहेत, असे रशीद म्हणाले यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: