ग्लोबल न्यूज– राज्यात झालेल्या अति पावसामुळे यंदा कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आशियातील सर्वात मोठ्या ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत यांचा परिणाम दिसून आला आहे. जवळपास नाशिक जिल्ह्यामधील सर्वच बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबरमध्ये कांद्याची आवक ६०-८० टक्क्यांनी कमी झाली आहे.
लासलगाव बाजार समितीत चालू आठवड्यात कांद्याला कमीत कमी १ हजार २०० तर जास्तीत जास्त ७ हजार ८२ आणि सर्वसाधारण ६ हजार ४०० रूपये असा भाव मिळाला आहे. तसेच नामपूर बाजार समितीत कमीत कमी २ हजार ५०० तर जास्तीत जास्त ८ हजार रूपये तर सर्वसाधारण ६ हजार ५०० रूपये इतका भाव मिळाला आहे.
चालू आठवड्यात कांद्याच्या आवकेत माफक वाढ झाल्याने दर स्थिरावले आहेत. कांद्याच्या वाढत्या किंमतीमुळे मागील काही दिवसांपूर्वी केंद्र सरकाने कांद्याच्या आयातीवरील निर्बंध शिथील केले आहेत. तसेच बफर स्टॉकमधून कांदा विक्री सुरू केली आहे. तर इराणमधून देशात ६०० टन कांद्याची आयात केली आहे. यामुळे कांद्याच्या दरात चढ- उताराचा कल निर्माण झाला आहे.
अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान झाल्याने आणि शेतकऱ्यांनी साडवलेला चाळीतील कांदा सडल्यामुळे याचा परिणाम कांद्याच्या दरावर झालेल्या आहे. तसेच येणाऱ्या काळात कांद्याचे दर वाढतील का कमी होतील हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. या ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातला आणि शेतकऱ्यांनी रब्बीचा साठवून ठेवलेला कांदा खराब झाला आहे. साधारणपणे आर्द्रतेनुसार चाळीत साठवलेला कांद्याचे नुकसान ३० ते ३५ टक्के असते. यावर्षी अतिवृष्टीमुळे आर्द्रता जास्त असल्याने साठलेल्या कांद्याचे प्रमाणापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
निर्यातबंदी लावल्यानंतर राज्यात एकूण १ लाख ४० हजार टन कांद्याची आवक झाली आहे. त्यापैकी अहमदनगरमधून सुमारे २५ हजार टन, नाशिकमधून ८० हजार टन आणि पुण्यातून १३ हजार टन आवक झाली आहे. तसे पहाता एकूण उत्पादनापैकी खरीपात सुमारे १० ते १५ टक्के उत्पादन होते. उशीराच्या खरीपात ३० ते ४० टक्के उत्पादन होते आणि रब्बीनंतर ५० ते ६० टक्के कांद्याची उत्पादन होते. रब्बीत जरी सर्वाधिक उत्पादन होत असले तरी सगळा कांदा विकला जात नाही.
दरम्यान, भारतात एका वर्षासाठी २६५ ते २७० लाख टन कांद्याची मागणी असते. त्या हिशोबानी एक महिन्यात जवळजवळ २२ ते २३ लाख टन कांदा लागतो तर दिवसाला कमीत कमी ५० हजार टन कांदा लागतो.
नाशिक जिल्ह्यातील ऑक्टोबर महिन्यात झालेली कांद्याची आवक टनात
बाजार समिती ऑक्टोबर २०२०- ऑक्टोबर २०१९ (कंसात घटलेली आवक)
१) लासलगाव- ५३०७ २४५०७ (-७८)
२) विंचूर- ५१०० १८०९१ (-७२)
३) निफाड- १७०० ८०१९ (-७८)
४) नामपूर- ६५०० २१०६७ (-७०)
५) पिंपळगाव बसवत- १५०० ८७८९ (-८२)