मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून भाजपा आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडत आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना घेरण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे.
“१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते,” अशा शब्दात पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक ट्विट करून भाजपा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कसहा प्रकारे लढा देत आहे याची माहिती दिलेली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला!,” असा आरोप केलेला आहे.