ग्लोबल न्यूज: दुपारच्या झोपेवरून पुणेकरांची खिल्ली उडवली जात असली तरी अशी झोप हा विनोदाचा विषय नसून आरोग्यासाठी ती फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. दुपारी पूर्ण झोप न घेता एखादी डुलकी घेतल्याने शरीराला काय फायदे होतात हे वाचल्यानंतर पुणेकरांची चेष्टा करणारेही कदाचित पुणेकरांप्रमाणेच दुपारची अशी डुलकी घेण्यास सुरुवात करतील.
साधारणपणे दुपारचे जेवण झाल्यानंतर प्रत्येकालाच काहीशी सुस्ती येऊन झोप घ्यावीशी वाटू लागते. पण दुपारी झोपले तर रात्री लवकर झोप लागत नाही असा अनुभव असल्याने दुपारची झोप टाळली जाते. तर कधी जेवल्यानंतर दुपारी झोपावे का, असा प्रश्नही पडतो पण अशी झोपेचे फायदे किंवा नुकसान माहिती नसल्याने बहुतेकजण त्या फंदात पडतच नाहीत.
पण असे सांगितले जात आहे की, दुपारची झोप ही शरीरासाठी फायदेशीर असते. रात्रीची पुरेशी झोप ज्याप्रमाणे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करते, शरीर आणि मनाला आराम देण्यासाठी अशी झोप आवश्यक असते. पण पुरेशी झोप न मिळाल्यास रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणाबरोबरच हृदयाचे आजार होण्याचीही शक्यता असते. पण सध्याच्या जीवनशैलीमध्ये रात्री पुरेशी झोप मिळत नसेल तर दुपारची झोप फायदेशीर ठरते.
दुपारच्या झोपेमुळे होतात हे फायदे
दुपारी थोडा वेळ झोप घेतल्याने स्मरणशक्ती चांगली राहते, एकाग्रतेवरही चांगला परिणाम होतो. मूड सुधारण्यास यामुळे मदत होते. मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. रक्तदाब कमी होण्यासही त्याचा फायदा होतो. इतकेच नव्हे तर ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे त्यांची प्रकृती दुपारच्या झोपेमुळे अधिक लवकर सुधारू शकते असे आयुर्वेदात सांगितले गेले आहे.
पण दुपारची झोप अर्ध्यातासापेक्षा जास्त घेऊ नये त्यासाठी खुर्चीवर बसल्याबसल्या एखादी डुलकी घ्यावी, अंथरूणात अंगावर पांधरूण घेऊन मात्र झोपू नये. त्याबरोबरच रात्री जेवणानंतर 10 मिनिटे चालण्यानेही शरीराला फायदा होतो.
हे आहेत काही तोटे
दुपारची झोप फायदेशीर असली तरी ती सर्वांसाठीच उपयुक्त असते असे नाही. ज्या व्यक्तींना डिप्रेशन, लठ्ठपणा यासारख्या समस्या आहेत, अशा व्यक्तींनी दुपारची झोप घेणे टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
तसेच दुपारी झोपणार्या व्यक्तींनीही 30 मिनिटांपेक्षा जास्त झोप घेऊ नये असेही तज्ज्ञ सांगतात. कारण जास्त झोपेमुळे शरीरातील फॅट्सचे (मेदाचे) प्रमाण वाढते. वजन वाढू लागते. कफदोषही वाढण्याची शक्यता असते.
दुपारच्या झोपण्यामुळे पचनक्रीया असंतुलीत होऊन रक्तातील साखरेचे पमाण वाढून मधुमेहाची शक्यता असते. कफ, पित्तदोषांबरोबरच रक्त दूषित होण्यामुळे त्वचारोगांचाही धोका वाढू शकतो.