अण्णा हजारेंचा इशारा:जनता जागी झाली तर मोदी सरकारही पडू शकते; सर्वच पक्षांकडून देशाला उज्ज्वल भवितव्य नाही
ग्लोबल न्युज: भाजप, कॉँग्रेस वा इतर कोणत्याही राजकीय पक्षांकडून देशाला उज्ज्वल भवितव्य मिळण्याची शक्यता नाही. सर्वच राजकीय पक्ष व नेते सत्ता, सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता याच्या मागे लागले आहेत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी जनतेचे मजबूत संघटन (जनसंसद) आवश्यक आहे. मजबूत जनसंसदेशिवाय देश वाचणार नाही, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. झोपलेली जनता जागी झाली तर मोदी सरकारही पडू शकते, असेही हजारे म्हणाले.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यकर्त्यांचे एकदिवसीय शिबिर रविवारी राळेगण सिद्धी येथे आयोजित केले होते. त्यात हजारेंनी देशाच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य केले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले. १४ राज्यांतील ८६ कार्यकर्ते शिबिराला उपस्थित होते.
मी टीकेकडे लक्ष देत नाही
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोनदा, २०१८ आणि १९ मध्ये आंदोलने केली. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे उपोषण केले. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळावा, अशी आपली आग्रही भूमिका आहे. शेतकरी आंदोलन आणि इतर बाबतीत माझ्यावर टीका होते, मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही. समाज आणि देशहितासाठी शक्य ते प्रामाणिकपणे करणे हे माझे काम आहे आणि ते मी गेली ४६ वर्षे मंदिरात राहून करीत आहे. – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.