राणे पितापुत्रांनी तोंड उघडले तर घाणच बाहेर पडते, भास्कर जाधव यांची घणाघाती टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याने त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात भारतीय जनता पक्षाला एकाही गावात यश मिळालेले नाही. कोकणात भाजप नावालासुद्धा शिल्लक राहिली नसल्याची टीका शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त जाधव नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला होता. उपस्थित माध्यमांनी राणे कुटुंबीय आघाडीवर करत असलेल्या आरोपासंदर्भात भास्कर जाधव यांना विचारले असता राणे कुटुंबियांवर जळजळीत टीका त्यांनी केली होती.
‘राणे पितापुत्रांनी तोंड उघडले तर घाणच बाहेर पडते’ अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली होती. तसेच औरंगाबाद नामांतर विषयावरून पक्षाची बाजू मांडत त्यांनी मंत्री धनंजय मुंडे प्रकरणात मुंडे यांची पाठराखण केली होती. आता राणे यांच्यावर केलेल्या टीकेला राणे कुटुंबीय काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.