मुंबई | शिवसेना पक्षाचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी पार पडला होता. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मोलाचं मार्गदर्शन करण्याबरोबरंच विरोधकांचा सुद्धा खरपूस समाचार घेतला होता.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री पदाची झूल बाजूला ठेवून मी बोलत आहे. भाजप सत्तेसाठी कासावीस झाला आहे. या नेत्यांना सत्तेची पोटदुखी झाली आहे. सत्ता नाही म्हणून त्यांचं पोट दुखत आहे. यांना मीच राजकीय औषध देणार आहे. मी ५५ वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना जाते. या सर्व शिवसैनिकांना माझं अभिवादन. माझ्या शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.
तसेच ते पुढे म्हणाले की, शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केल्यावर आमच्या हिंदुत्वावर, विचारांवर संशय घेतला जातो. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का?, असं विचारलं जातं. मला या लोकांना सांगायचं आहे की, हिंदुत्व हे काही नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, हिंदुत्व आमचा श्वास आहे.