कशी असते नात्यांची रेसिपी ; वाचा सविस्तर-
*सुग्रास भोजनाचं ताट समोर वाढलं होतं. स्वादिष्ट पदार्थ ताटात छान वाढलेले. प्रत्येक पदार्थ जिथल्या तिथे. प्रत्येक पदार्थाला आपलीच वेगळी चव. आपलीच ठरलेली जागा.*
*सहज मनात आलं….*
*आपलं आयुष्य पण असंच तर आहे ! सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट. जशी ताटात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली असते तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची. प्रत्येक नात्यात एक वेगळाच गोडवा.*
*भोजन वाढण्याची सुरुवात होते मीठाने. डावीकडून.*
*पण सुरुवात left ने झाली तरी ते always right असतं.*
*मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव.हेच आपल्या आयुष्याचं सार.*
*आपले आईवडील- ज्यांच्या मुळे जन्म मिळतो. ज्यांच्या शिवाय आपलं जीवन बेचव. मायेने डोक्यावरुन फिरणारे हात असावेत, पाठीवर कौतूकाची थाप मिळावी, आणि हिम्मत देणारे शब्द ऐकावे.*
*ताटाच्या मध्यभागी गोड वरण भात. कालवून एकजीव झालेला वरण -भात. प्रयत्न करूनही एकदा कालवला की वरणभात वेगळा करताच येत नाही. हे असतं नवरा-बायकोचं नातं. थोड्याशा अवधीत किती एकजीव होतात !*
*वरणभातावर साजुक तुपाची धार नसेल तर त्या वरण भाताला काय चव ?*
*ही चव आपल्या जीवनात आणतात ती आपली मुलं !!*
*त्यांच्या शिवाय जीवन नीरस. आजी-आजोबांसाठी दुधावरची साय.*
*वरणभाताच्या थोडी वर असते साधी पोळी. कशीही लाटा, आपण देऊ तो आकार घेते.* *चांगली भाजून पानातल्या सगळ्या पदार्थांच्यात समरस होते.*
*ही आहे आपल्या घरात ग्रहप्रवेश करणारी आपली सून !!* *आल्या आल्या सगळ्या नात्यांचा अगदी मनापासून स्वीकार करते. सगळ्यांशी समरस होते आणि अलगद् आपली कधी होते समजतच नाही !*
*उजवीकडे असते भाजी.* *कधी रस्सा , कधी सुकी, कधी तिखट , कधी आंबटगोड! पण पानात अत्यंत आवश्यक.*
*थोडी असली तरी चालते पण पाहिजेच.*
*हे नातं असतं बहिण भावंडांचं !!!*
*कधी प्रेमाचं, कधी मस्ती, कधी रुसवा फुगवा !*
*एक तरी बहिण भाऊ असावाच. कधी अडचणीत हाक मारायला , कधी कोतुकाची थाप द्यायला तर कधी खंबीरपणे पाठीशी ऊभं रहायला. कधीतरी लुटुपुटुचं भांडायला सुद्धा !*
*पानात कधीतरी वाटीत असतं काहीतरी गोड किंवा काहीतरी पक्वान्न. जे आपण रोज खातोच असं नाही पण जे असल्यावर जेवणाची लज्जतच न्यारी !!*
*हे आहेत आपले आप्तेष्ट . आपले नातेवाईक. आपले सगेसोयरे. रोज न भेटणारे पण सणासुदीला आणि समारंभात आवर्जून भेटणारे. ज्यांच्या भेटीने आपले चारदोन क्षण खूप मजेत जातात. ज्यांचं असणं गरजेचं आहे. ही आपली विसाव्याची ठिकाणं असतात.* *रोजच्या रहाटगाडग्यातून थोडासा विसावा. जायला यायला काही हक्काची घरं.*
*मिठाच्या खाली असते लिंबू ,चटणी ,लोणचं.*
*आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारी. तिखट चमचमीत चविष्ट !!!*
*हे काम असतं आपल्या मित्र मैत्रिणींचं !*
*आपल्या जीवनात हास्य आणणारे, सतत आशावादी असण्यास प्रेरित करणारे , आपल्या मदतीस धावत येणारे. आपले सुखदुखाःचे सोबती. आपल्या आयुष्याची रंगत वाढवणारे.*
*चटणी , लोणचं नंतर नंबर लागतो कोशिम्बीरीचा !!*
*कुठलीही असो, साधारण पौष्टिक.*
*कधी कधी भाजी नसली तर तिची जागा घेणारी,*
*भाजीच्या ऐवजी मदतीला धाऊन येणारी !*
*हे झाले आपले शेजारी !!*
*थोडा राग लोभ असू शकतो, पण मनात किल्मिष न ठेवणारे. घरातल्या अडचणीत मदतीला धावत येणारे, प्रसंगी वडिलधार्यांची जागा घेणारे.*
*ही पदार्थ आणि नात्यांची तुलना नाही, तर साम्य आहे !*
*प्रत्येक पदार्थाचा एक गुणधर्म, तसाच त्यात वापरलेल्या साहित्याचा सुद्धा.*
*जसा मीठाचा खारटपणा, साखरेचा गोड , चिंचेचा आंबट , मिरचीचा तिखट तर मेथीचा कडू.*
*कडवटपणा हा कार्ल्याचा गुणधर्म. तर ते कडू म्हणून आपण टाकून देतो का? नाही !!* *चिंच गूळ घालून त्याचा कडवटपणा आपण कमी करतो.*
*हेच नात्यांच्या बाबतीत.* *परिस्थितीने नात्यात* *कडवटपणा येऊ शकतो पण म्हणून आपण नातं विसरतो का? नाही !!* *काही आंबटगोड आठ्वणींच्या सहाय्याने नात्यातला गोडवा परत आणण्याचा प्रयत्न करतो.* *तोंड कडू पडलं तर सुग्रास जेवण पण बेचव लागतं.* *म्हणून जेवण सोडतो का? नाही ! आपल्या आवडीने चवीत थोडा बदल करतो.* *असाच बदल वेळोवेळी नात्यात पण करावा लागतो, नाती टिकवण्यासाठी , सांभाळण्यासाठी !*
*पंचपक्वान्न समोर आहेत पण ठसका लागला तर पाणी देणारे कुणी नाही, पाठीवरून मायेने फिरणारे हात नाहीत, आपुलकीने हवं नको विचारणारे शब्द नाहीत तर ती पक्वांन्ने काय कामाची ?*
*पदार्थांत सगळे जिन्नस त्या त्या प्रमाणात असतील तर तो उत्कृष्टच होतो.* *कशाचाही अतिरेक झाला की पदार्थ बिघडतो. नात्यात पण हवाच की रुसवा फुगवा, राग लोभ, प्रेम ,माया. कधी मत्सर सुद्धा. पण सगळं प्रमाणात ! प्रत्येक नात्यात प्रेम ,आदर , सन्मान आणि मर्यादा असतात. त्याचा अतिरेक झाला की नाती बिघडतात, मग ते प्रेम असलं तरी !!*
*एवढं साम्भाळले तर दुरावा कधीच येणार नाही.*
*नाती आदर्शच असावी असं नाही. कधी कधी वरुन आदर्श वाटणारी नाती आतून खूप पोकळ असू शकतात.*
*नाती आपल्यासाठी असावी आणि ती आपण मनापासून जपावी.*
*राग ,लोभ ,रुसवे ,फुगवे ,प्रेम ,माया ,मत्सर, आदर, सन्मान ,मर्यादा हे सगळं त्या त्या प्रमाणात असले की झाली “नात्यांची recipe ” तयार !!*
*प्रयत्न करुन बघायला काय हरकत ***