वाईट दिवस जातात हा आशावाद सकारात्मकतेकडे नक्की नेईल!
यशाची गुरुकिल्ली
सौ. माधुरी पळणिटकर
नक्की वाचवा असा लेख..
विचार हे चुंबक(magnet ) सारखे असतात. प्रत्येक विचारांचा एक तरंग (frequency ) असते आणि हे विचार सृष्टीकडे पाठवले जातात.
आपल्या प्रत्येकात प्रचंड ऊर्जा आहे आणि आपण सृष्टीचाच भाग आहोत. आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी योग्य वेळ न शोधता कृती करणं जास्त आवश्यक असतं.
चांगल्या व सकारात्मक विचारांमुळे आपण आनंदी राहतो. जगत असताना आपण जशी ऊर्जा बाहेर सोडता तशीच ऊर्जा आपल्याला परत मिळते. यालाच आकर्षणाचा सिध्दांत म्हणतात.
आपले अंतर्मन आणि खाजगी किंवा व्यावसायिक आयुष्यातील आपल्याला जे ध्येय साध्य करायचे किंवा जे स्वप्नं सत्यात उतरवायचे आहे त्यामध्ये जर कुठले नकारात्मक विचार, भावना, कंपने, ऊर्जा नसेल तर आपले ध्येय पुढच्याच क्षणी साध्य होते. ध्येय म्हणजे असा उद्देश की, जो एखादी व्यक्ती किंवा संस्था प्राप्त करण्याचे इच्छितात आणि त्यासाठी प्रयत्न करतात.
एका व्यक्तीच्या डोक्यात दिवसभरात सुमारे ६० हजार प्रकारचे विविध विचार येतात किंवा इच्छा निर्माण होतात. या इच्छा अदृश्य स्वरुपाच्या असतात. प्रत्येकाला आपण यशस्वी व्हावे असेच वाटत असते. यासाठी ध्येय निश्चितीची नितांत आवश्यकता असते. स्वत:च्या सामर्थ्याला ओळखण्यासाठी प्रत्येकाने ( SWOT ) केलेेेच पाहिजे. आता SWOT म्हणजे काय हे समजवून घेवू..आजचा युगात swot एनालिसिस ला खूप महत्व आले आहे..
त्यासाठी आपली शक्तिस्थाने(S =स्ट्रॉंग पॉईंट ) यावर लक्ष केंद्रीत करायला हवे.
प्रत्येक व्यक्तीमध्ये निश्चितच काही कलागुण व शक्तिस्थाने असतात. मात्र त्या व्यक्तीला त्याची जाणीवही नसते म्हणूनच आत्मपरीक्षण करुन आपले आई, वडील, नातेवाईक, मित्र परिवार यांच्याशी चर्चा करुन शक्तिस्थाने ओळखून त्यांचा विकास करणे गरजेचे आहे.
दुसरा टप्पा म्हणजे (W =वीक पॉईंट ) कमतरता किंवा उणिवा. या जगात कोणीच परिपूर्ण नसतो.(no one can perfect ) त्यामुळे आपल्या उणीवा ओळखून त्या कमी कशा करता येतील याकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे.
(O =opportunities ) संधी. हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे आजच्या जीवघेण्या स्पर्धेत सुद्धा अनेक संधीं आहे. प्रत्येक क्षेत्रात दिवसागणिक नवनवीन संधी निर्माण होत आहेत म्हणून त्या प्रत्येक संधीचा उपयोग करुन जीवनाचे सोने केले पाहिजे.
(T =threats ) धोके. आयुुष्याच्या प्रवासात अनेकदा धोक्याची वळणे येवू शकतात. अशावेळेस काळजीपूर्वक मार्गक्रमण करणे आवश्यक असते. संकटावर मात करुन यशोशिखराकडे वाटचाल करावयास हवी.
यशस्वी होण्यासाठी ध्येय हे वास्तववादी असायला हवे. सकारात्मक विचारसरणी खूप महत्त्वाची ठरते. सध्या मोठ्या प्रमाणात समाजात ध्येयाबाबत अनास्था दिसून येते. जर संगोपनच नकारात्मक वातावरणात झाले असेल तर त्या व्यक्तीमध्ये सतत निराशावादी दृष्टिकोन निर्माण होतो. मी यशस्वी झालो नाही तर लोक काय म्हणतील हाच विचार नकारत्मेला जन्म देतो..
थॉमस अल्वा एडिसनने ९९९ प्रयोग केले ते अयशस्वी झाले पण हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. त्यांना पत्रकारांनी विचारले एवढे प्रयोग फसले त्याबद्दल तुम्हाला काय वाटले? तेव्हा त्यांचं उत्तर खूपच प्रेरणादायी असं होतं. ९९९ प्रयोग फसले असे म्हणू नका. ९९९ वेळा मी हे सिध्द केलं की या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही म्हणून नकारात्मक दृष्टिकोन टाळायला हवा..
शरीराने निरोगी पण मानसिकतेने कमजोर असणार्याला मृत्यू येण्यासाठी एक नकारात्मक विचारही पुरेसा ठरतो. उलट सकारात्मक विचारशक्तीमुळे माणूस मृत्यूच्या दाढेतून परतही येऊ शकतो.
या जगात जी माणसे कर्तृत्वाने मोठी झाली त्यांच्या यशाचे गमक शोधताना एक समान सूत्र सापडते ते म्हणजे इतरांच्या नकारात्मक गोष्टींची चर्चा करण्यात त्यांनी आपला सकारात्मक वेळ कधीही वाया घालवला नाही.
आशावाद हे सकारात्मक दृष्टिकोनाचे पुढचे पाऊल आहे. एखादी गोष्ट होईल असे म्हटल्यामुळे ती होईल असे नाही. पण ती गोष्ट घडण्याची शक्यता वाढते. असे सकारात्मक विचार अंगी असणे महत्त्वाचे असते.
सकारात्मक विचारांनी सुख, समृध्दी दिसते तर नकारात्मक विचारांनी नैराश्य दु:ख दिसते. दुसर्यांजवळ काय आहे हे पहात बसू नका. आपल्या जवळ काय आहे यात समाधानी राहणे गरजेचे आहे. सतत नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारेल. निस्वार्थ भावनेेने, परक्या व्यक्तीची मदत केल्याने समाजातही सकारात्मक उर्जेचा प्रवाह संचारेल.
सकारात्मक विचार रुजवणे गरजेचे:
जे लोक तुमच्याशी वाद घालून जिंकतात त्यांच्यापासून दूर रहा. आपल्याला पडणार्या स्वप्नांचा देखील आपल्या मानसिकतेशी जवळचा संबंध असतो. ज्यांना भयानक स्वप्ने पडतात त्या व्यक्ती मानसिक तणावात असतात. मनाचा व शरीराचा एकमेकांशी गाढ संबंध असतो. अनेकदा मन दु:खी असल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो.
कामाच्या ठिकाणी जे तणाव (टेन्शन) असते ते घरी घेऊन येऊ नका. घरी असताना कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवा. त्यासाठी वेळेचे आणि कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. चांगली पुस्तके वाचा. समवयस्कांचा एक छोटा ग्रुप तयार करुन त्यामध्ये सकारात्मक विचार रुजवणे ही एक चांगली कल्पना आहे.
नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच मनाशी युध्द करणे. यालाच तुकाराम महाराज म्हणतात, रात्रं दिन आम्हा युध्दाचा प्रसंग.
टेबलवर एक ग्लास पाण्याने भरलेला आहे असं म्हटलं की मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटल्यावर नैराश्य, व्याकुळता आणि हताशपणा येतो.
माजी राष्ट्रपती म्हणजेच मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांनी विमान अभियांत्रिकी पदवी घेतल्यावर भारतीय वायुदलात त्यांना वैमानिक होता आलं नाही म्हणून ते हरले नाहीत.
सकारात्मक विचार येण्यासाठी प्राणायाम करणे, रात्री झोपताना संगीत ऐकणे, प्रार्थना केल्यास उत्तम फरक दिसतो. वैचारिक बदल घडवून आणण्यासाठी खास �सायकोथेरपी� देखील वापरली जाते. ज्याला कोगनेटिव्ह थेरपी असेही म्हणतात.
प्रमाणाबाहेर नकारात्मक विचार आले तर औषधोपचाराची नितांत गरज असते. ज्याने मेंदूतील रसायनांवर नियंत्रण मिळवता येते. सकारात्मक विचारांसाठी नृत्य, गाणे, कला यांचा समावेश जीवनपध्दतीत आमूलाग्र बदल घडवतो. मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन तुमचं मन मोकळं करुन पुन्हा आनंदी व सकारात्मक जीवन जगता येऊ शकतं.
आपल्याला हवी असलेली गोष्ट स्वप्नात बघणे हेही सकारात्मक उपायांमध्ये समाविष्ट असते. मेंदूला शांत झोप मिळवून देऊन शरीर व मनावरचा अतिरिक्त ताण नाहीसा करुन परिस्थितीला सामोरे जाण्याची मनाची शक्ती वाढवता येते.
निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त वेळ घालवणे हाही सर्वोत्तम उपाय आहे.
लोकांना खूष ठेवता ठेवता कधी स्वत:लाही आनंदाची गरज आहे हे आपण विसरुन जातो म्हणूनच स्वत:ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. स्वत:च्या आवडीला प्राधान्य द्या.
वाईट दिवस जातात हा आशावादी दृष्टिकोन सकारात्मक विचारांकडे नक्कीच नेईल. दाबून ठेवलेले हुंदके, भावना, अतिसंवेदनशील मनावरचे आघात यामुळे वेळोवेळी व्यक्त होणे गरजेचे आहे. छोट्या गोष्टी व प्रयत्नातून हळूहळू सकारात्मकडे वाटचाल केली तर आयुष्याचा प्रवास आनंदी होईल यात काही शंकाच नाही.
जी माणसे तुमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण करतात किंवा कुरघोडी करुन मानसिक छळ करतात त्यांच्यापासून दूर रहा. तुमचं निरीक्षण करुन जी माणसे तुम्हाला आनंद देतात त्यांना भेटून मन आनंदी करा. आज अंधार असला तरी प्रकाश यायचा थांबत नाही. हे बजावून नकारात्मक विचारांकडून सकारात्मक जीवनशैलीकडे वाटचाल करावी. मग पहा यश आणि आनंदाची वाट सोपी होईल.
साभार आपलं मानसशास्त्र