शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का ? – किरीट सोमय्या
औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र राज्यात शिवसेनेची सत्ता असूनही तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असून सुद्धा मागच्या एक वर्षांपासून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणे शिवसेनेला जमलेले नाही.
याच मुद्द्यावर आता राज्यातील राजकारण तापलेले दिसून येत आहे. त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचे थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यात मनसे आणि भाजपने सुद्धा उडी घेतली होती.
त्यात आता भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सेनेला टोला लगावला आहे. काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का, याचे उत्तर द्यावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.