मुंबई । दरवर्षी दिवाळी दरम्यान एसटी महामंडळाकडून हंगामी तिकीटवाढ केली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुर्वीच्या तिकीटावरच प्रवाशांना दिवाळीच्या प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज यासंबंधी घोषणा केली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी दरवाढ रद्द करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. राज्य प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अशा गर्दीच्या काळात महसुल वाढीचा स्त्रोत म्हणून 30 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येते. मात्र कोरोनामुळे यंदा प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये तसेच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत यंदा तिकीट दरवाढ न करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.