राज्य सरकार एका वर्षात महाविनाश आघाडी वरून आता हे महावसुली आघाडी सरकार झाले आहे-फडणवीस

राज्य सरकार एका वर्षात महाविनाश आघाडी वरून आता हे महावसुली आघाडी सरकार झाले आहे-फडणवीस

मंगळवेढा    ः ‘‘तुम्ही भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा. उर्वरित करेक्ट कार्यक्रम मी करतो, त्याची चिंता करू नका,’’ असे वक्तव्य भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा येथे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, सुभाष देशमुख, जयकुमार गोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोत, राम शिंदे, लक्ष्मण ढोबळे, भाजपचे उमेदवार आवताडे, बाळा भेगडे, चित्रा वाघ, श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, सुरुवातील हे महाविकास आघाडी सरकार होते, एका वर्षात महाविनाश आघाडी सरकार झाले; परंतु आता हे सरकार महावसुली आघाडी सरकार झाले आहे. त्यामुळे पोलिस, सामान्य माणूस, शेतकऱ्याकडून जिथे मिळेल तिथे वसुली करण्याचा सपाटा लावला आहे. कोरोनाच्या संकटात वीजबिल वसूल केले.

 

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही काम बंद आंदोलन केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन वीज बिल वसुली स्थगितीचा आदेश दिला. पण, अधिवेशन संपताच वसुलीबाबत त्यांनी पुन्हा आदेश दिले. या सरकारने शेतकऱ्याकडून जवळपास पाच हजार कोटी वसुली केले आणि बिल्डरांना पाच हजार कोटींची सवलत दिली.

मोदी सरकारच्या काळात जलसिंचनासाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पोटनिवडणुकीनंतर वीज तोडणीची मोहीम सुरू केली जाणार आहे. पंधरा वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्याला आलेल्या निधीपेक्षा जास्तीचा निधी मागील पाच वर्षाच्या काळात दिला आहे. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, त्याच पद्धतीची सरकारची भूमिका आहे. तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून द्या. तालुक्यातील 35 गाव उपसा सिंचन योजनेसाठी या राज्य सरकारने निधी नाही दिला तर मी थेट मोदी सरकारकडून निधी उपलब्ध करतो.

आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की अनैसर्गिक सरकारच्या विरोधात सध्या जनतेत आक्रोश आहे. या सरकारच्या विरोधातील ही लढाई आहे, त्यामुळे गट बाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने काम करून आवताडे यांना संधी द्यावी. फक्त निवडणुकीपुरती सुरू असणारी भोसे प्रादेशिक योजना आज बंद असल्यामुळे लोकांना दक्षिण भागात पाणी पाणी करावे लागत आहे. नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असतानाही पक्षपात न करता पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: