गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचे खासगी व शासकीय निवासस्थानी धाडी टाकल्या. ईडीने मुंबई, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 7 मालमत्तांवर 14 तास झडती घेतली. ईडीने त्यांच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि बँक खात्याशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.
अनिल परब यांच्या संपत्तीत 8 वर्षांत 4 पट, तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 25 पट वाढ झाल्याचे तपासात समोर आले आहे. गुरुवारी सकाळी 6.30 वाजता ईडीचा हा छापा सुरू झाला आणि रात्री 8.30 पर्यंत चालला. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी परब यांची कसून चौकशी केली. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ED ने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात इतर राज्याच्या तुलनेत ED ने महाराष्ट्रात किती धाडी टाकल्या यांचा आकडा केंद्र सरकारने जाहीर करावा, असा टोला बच्चू कडू यांनी मोदी सरकारला लगावला आहे. ED केंद्र सरकारसाठी काम करते, असे देखील बच्चू कडू म्हणाले. तर दुसरीकडे परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे म्हणजे सूडबुद्धीची कारवाई असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.