कोरोना गेला असं समजून वागू नका, ‘ढिलाई परवडणारी नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पाश्चिमात्य देशात दुसरी लाट आलीय आपल्या देशातही काही शहरात नाईट कर्फ्यु लागलाय. ही दुसरी लाट त्सुनामी सारखी येऊ शकते – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ग्लोबल न्यूज: कोरोनापासून राज्यातील जनतेचा बचाव करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यापुढेही सरकार आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करेल. पण नागरिकांना काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. गर्दी टाळावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांनी आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.

अनेक जण मास्क न घालताच सध्या वावरत आहेत. कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे अशी ढिलाई परवडणारी नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले.

गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं.गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. मात्र आपण ते अतिशय साधेपणानं साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला.

जनतेकडून मिळालेल्या या सहकार्याला तोड नाही. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारचं सहकार्य मिळेल,’ अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या लाटेचा धोका सांगितला. ‘दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक पाश्चिमात्य देशांत तर लाट नव्हे, त्सुनामीच आली आहे. तशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे,’ असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार? अजितदादांनी दिले स्पष्ट उत्तर

गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आपल्यासाठी राबत आहेत. त्यांच्यावर आणखी किती ताण आणायचा हा प्रश्न आहे आणि हे आपल्या हाती आहे. अनेक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनाची लाट आली आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी पडली तर मग आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
गेल्या महिन्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात घसरण सुरू होती. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्या होणाऱ्यांच्या तुलनेत कमी होती. मात्र दिवाळीत बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला.

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या यापेक्षा कमी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: