काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर सोमवारी घणाघाती हल्ला चढविला. आजारी काँग्रेसला प्रार्थनेची नाही, तर औषधपाण्याची (दुवा की नहीं, दवा की जरुरत है) गरज असून, दुर्दैवाने हे औषधोपचार डॉक्टरांऐवजी कंपाऊंडर करीत आहेत, असे ते म्हणाले. पक्ष सुरळीत करण्यासाठी नेतृत्वाकडे वेळ नाही. काँग्रेस राज्यांमध्ये असे नेते देत आहे, जे लोकांना पक्षाशी जोडण्याऐवजी संघटना सोडायला लावत आहेत, असेही आझाद यांनी पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल करताना म्हटले.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. आपण लवकरच पक्ष स्थापन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर युतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, इतरही पक्ष आहेत. आझाद यांचा डीएनए मोदीमय झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपावरून त्यांनी राहुल यांच्यावर हल्ला चढविला. नरेंद्र मोदींशी ते लोक मिळालेले आहेत जे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तसेच मोदींनी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहिलेले आहे. यात जे लोक त्यांची मदत करीत आहेत ते मोदींना मिळालेले आहेत. जे संसदेतील भाषणानंतर मोदींची गळाभेट घेऊन म्हणतात आमचे हृदय स्वच्छ आहे, ते मिळालेले आहेत की नाहीत, असा सवाल आझाद यांनी केला. आता या टीकेला काँग्रेस काय प्रतिउत्तर देते हे पहावे लागणार आहे.