घटस्फोट – आयुष्याचा शेवट की नवीन सुरुवात ?

घटस्फोट – आयुष्याचा शेवट की नवीन सुरुवात ?

” ह्या तुमच्या लेकीला अगदी कशाचेही वळण नाही…हिला चारचौघांत न्यायची सुद्धा लाज वाटते मला…मी हिला वागवणार नाही म्हणजे नाही…” अजय तावातावाने बोलत होता.

स्वाती मात्र त्या बैठकीत एका कोपऱ्यात भीतीने थरथरत उभी होती. तिची आई तिला सावरत होती पण मनाने स्वातीची आई देखील खूप घाबरली होती. फक्त त्यांना भीती चेहऱ्यावर दिसू द्यायची नव्हती म्हणून उसण अवसान आणून स्वातीला धीर देत होती.

त्या बैठकीत स्वाती आणि अजयच्या घरची मंडळी आपापले मुद्दे मांडत होते. अजयच्या घरच्यांनी सुद्धा त्याला स्वातीला पुन्हा नांदवायला नेण्याची विनंती केली पण अजय मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता. दोन्ही पक्षांतील व्यक्तींच्या चर्चेचा काहीच निकष लागत नव्हता. शेवटी स्वातीचे वडील मोठ्या निर्धाराने उभे राहिले आणि म्हणाले…

” ठीक आहे…तुम्हाला जर स्वातीला वागवयचेच नाही तर मी सुद्धा नेहमीप्रमाणे जबरदस्तीने तुम्हाला तिला घेऊन जायला सांगणार नाही…तुम्हाला घटस्फोट हवा असेल तर आम्ही घटस्फोट द्यायला तयार आहोत…”

 

हे ऐकताच बैठकीत शांतता पसरली. सर्वजण स्वातीच्या वडिलांच्या तोंडाकडे पाहत होते. जो अजय आतापर्यंत तावातावाने सर्वांशी बोलत होता तो सुद्धा गप्प झाला. कालपर्यंत पोरीला नांद वा म्हणून त्याच्या पायात पडणारे त्याचे सासरेबुवा आज अचानक घटस्फोट द्यायला तयार झाले होते.

अजयच्या मनाचेच झाले होते. पण हे सर्व इतक्या सहजपणे व्हावे असे त्याला मुळीच वाटले नव्हते. त्याला वाटले होते की मुलीकडील सर्व मंडळी त्याला विनवण्या करतील. स्वाती त्याचे पाय धरून त्याला नांदवण्याची भिक मागेल आणि तो त्या सर्वांचा यथेच्छ अपमान करून तिला घटस्फोट देईल.

पण स्वातीचे वडील लवकरच घटस्फोट द्यायला तयार झाले आणि अजयला जास्त काही बोलताच आले नाही. शेवटी लग्नात मुलीला जे स्त्रीधन दिले होते ते परत देऊन घटस्फोट घेण्याचे सर्वानुमते ठरले होते. आणि उभय पक्षांची बैठक संपली.

स्वातीला या सर्वांवर विश्वास बसत नव्हता. ती बराच वेळ कुणाशी काहीच बोलली नाही. घरात कोणीच एकमेकाशी बोलत नव्हते. स्वातीचे वडील मात्र भूतकाळाच्या विचारात गढून गेले.

स्वातीचे नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. स्वाती लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती. नाकी डोळी नीटस फक्त रंगाने थोडी सावळी होती. लहानपणी पासूनच तिचे स्वप्न होते. खूप शिकून अधिकारी व्हायचे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा म्हणून बारावीला चांगले मार्क्स मिळूनही तिने कलाशाखेत प्रवेश घेतला.

स्वातीच्या वडिलांना आधीपासूनच स्वातीचे फार कौतुक होते. पण एके दिवशी अचानक अजयचे वडील स्वातीच्या घरी आले आणि त्यांनी अजयसाठी स्वातीला मागणी घातली. सुरुवातीला स्वातीच्या वडिलांनी नकारच दिला. पण अजयच्या वडिलांनी त्यांना स्वातीच्या पुढील अभ्यासासाठी आम्ही तिला मनापासून सहकार्य करू, आणि तिला मुलीप्रमाणे सांभाळू असा शब्द दिल्याने स्वातीच्या वडिलांनी ह्या लग्नासाठी होकार दिला.

अजय तसा चांगला मुलगा वाटला त्यांना. तो सुद्धा आधी गावातच शिकला होता मात्र पुढील शिक्षणासाठी तो पुण्याला गेला आणि तिथेच शिकून चांगल्या नोकरीवर लागला होता. त्यामुळे तो स्वातीच्या शिक्षणाला नक्कीच महत्व देईल असे तिच्या वडिलांना वाटले.

स्वातीच्या वडिलांनी स्वातीला अजयच्या स्थळाबद्दल सांगितले. स्वातीला एवढ्यात लग्नाचा विचारही करायचा नव्हता पण तिच्या वडिलांची खूप इच्छा होती की ह्या दोघांचं लग्न व्हावं. शेवटी त्यांच्या इच्छेखातर स्वाती लग्नाला तयार झाली. कारण अजयच्या घरच्यांनी तिला अभ्यासासाठी आधीच परवानगी दिली होती.
स्वातीने लग्नासाठी होकार देताच अवघ्या पंधरा दिवसात साखरपुडा आणि पुढच्या दोन महिन्यात दोघांचे लग्न पार पडले. स्वाती ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने त्यांनी दणक्यात लग्न लावून दिले होते. लग्न झाल्यावर काही दिवस गावी राहून दोघेही शहरात निघून गेले आणि तिथे त्यांनी त्यांचा नवीन संसार थाटला.

स्वातीने तिच्या नवीन संसारासाठी अनेक स्वप्ने पाहिली होती. पण प्रत्यक्षात मात्र तिच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिलेले होते. अजय तिच्याशी थोडा तुटक वागत होता. तो तिच्याशी अगदी मोजकेच बोलायचा. कधीच कुठे बाहेर नेले नाही की हौसेने तिच्यासाठी काही आणले नाही.

स्वातीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो उलट स्वातीवरच चिडला. मला जास्त बोलायला आवडत नाही म्हणून तिलाच बडबड करणारी, गावंढळ म्हणून हिणवले त्याने. तिच्यासाठी मात्र त्याचे हे रूप नवीनच होते. तिला वाटले अजयला आणखी काही वेळ हवा असेल म्हणून ती गप्प बसली.

जसजसा काळ जाईल तसतसा अजयदेखील आपल्याशी मनमोकळेपणाने बोलायला लागेल म्हणून ती सर्वकाही गुपचूप सहन करत होती. पण परिस्थिती सुधारण्या ऐवजी आणखीनच बिघडत चालली होती. अजय आता प्रत्येक लहानसहान बाबतीत तिच्यावर चिडा यचा. प्रसंगी हात उचलायला देखील मागेपुढे पाहत नसे.

नेहमी हसरी आणि बोलकी असणारी स्वाती आता मात्र सतत भीतीच्या सावटाखाली असायची. अशा मनःस्थितीत तिचा अभ्यास तर अजिबात होत नव्हता. लग्न झाल्यावर तब्बल चार महिन्यांनी स्वाती जेव्हा माहेरी आली तेव्हा पार सुकलेली होती.

तिच्या आईवडिलांनी तिला विचारले देखील की काही त्रास आहे का ? पण स्वातीने त्यांना काही सांगितले नाही. नवीन वातावरण असल्याने सद्ध्या तिथे जुळवून घेता आले नसल्याचे सांगत स्वातीने त्यांना अजयच्या वागणुकीबद्दल काहीच सांगितले नाही. दोन चार दिवस माहेरी राहून स्वाती पुन्हा अजयसोबत शहरात निघून आली

मात्र अजूनही अजयचे वागणे काही बदलले नव्हते. उलट आताशा तो जास्तच चिडचिड करायला लागला होता. तो स्वातीला प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून रागवायचा. स्वाती मात्र सर्वकाही गुपचूप ऐकुन घ्यायची.

एके दिवशी अजय घरी दारी पिऊन आला आणि आल्याबरोबर स्वातीला काहीबाही बोलू लागला. तेव्हा मात्र स्वाती मनातून खूप घाबरली. पण अजय तिच्यासमोर बरळत होता तेव्हा त्याच्या बोलण्यातून स्वातीला त्याच्या वागणूक मागचे खरे कारण कळले.

अजयला स्वाती मुळात आवडलीच नव्हती. स्वाती रंगाने सावळी होती आणि त्याला एखाद्या गोऱ्यापान, सुंदर मुलीशी लग्न करायचे होते. जीला तो स्वतःसोबत अगदी गर्वाने फिरवू शकेल, मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये बायकोला घेऊन मिरवू शकेल. पण त्याच्या वडिलांनी त्याला तिच्याशी लग्न करायला एकाप्रकारे जबरदस्ती केली होती.

त्याचे कारण म्हणजे स्वाती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि लग्नानंतर तिच्या वडिलांची सर्व संपत्ती तिच्याच नावे होणार होती. म्हणून त्यांनी स्वाती आणि अजयचे लग्न लावून दिले. अजयने स्वाती शी लग्न केले पण जेव्हा तो इतरांच्या सुंदर बायका पाहायचा तेव्हा त्याला फार वाईट वाटायचे. आणि ह्या सर्वाचा राग तो स्वातीवर काढायचा.

अजयच्या तोंडून हे सर्व ऐकुन स्वाती पार कोलमडून गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी स्वातीने अजयला याबाबतीत जाब विचारला तेव्हा त्याने तिला सरळ तिच्या माहेरी नेऊन सोडले आणि उलट तिच्या वडिलांना म्हणाला की तुमची मुलगी खूप उद्धट आहे. नवऱ्याला जाब विचारते. हिला समजावून सांगा. तेव्हाच हिला परत नेईल नाहीतर ठेवा तुमच्याकडेच.

आता स्वातीच्या वडिलांना तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्यामागचे खरे कारण कळाले होते. अजय स्वातीला माहेरी सोडून एकटाच निघून गेला. दोन चार दिवस स्वाती खूप रागात होती. अजयने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. त्याला ती आवडली नव्हती तर ते त्याने आधीच सांगायला हवे होते असे स्वाती अन् तिच्या आईवडिलांना दोघांनाही वाटले होते.

पण हळूहळू अजयवरचा राग ओसरला. आजूबाजूचे स्वातीच्या माहेरी राहण्यामुळे कुजबुज करू लागले होते. शेवटी आता लग्न झालेले आहे आणि निभावावे लागेल म्हणून स्वाती पुन्हा अजयकडे परत गेली. स्वातीच्या वडील तिला सोडवायला गेले आणि अजयला स्वातीला चांगले वागवण्याची विनंती केली.

अजयने तेवढ्यापुरता होकार दिला मात्र आता त्याची हिम्मत फार वाढली होती. तो प्रत्येक लहानसहान गोष्टीत भांडण उकरून काढायचा आणि उठसुठ स्वातीला माहेरी पाठवायचा. प्रत्येकवेळी स्वातीचे वडील अजयला गयावया करायचे आणि स्वातीला परत अजयकडे सोडवून यायचे.

पण यावेळी मात्र अजय हट्टालाच पेटला होता. त्याला स्वातीकडून घटस्फोट हवा होता. सुरुवातीला अजयला समजावण्याचा खूप प्रयत्न केला सर्वांनी पण त्याने कोणाचेही ऐकले नाही. शेवटी स्वातीच्या वडिलांनाही कळून चुकले होते की अजय आता सुधारणार नाही. आपण इतके दिवस त्याचा अहंकार कुरवाळत बसलो त्यामुळे ह्याने आपल्या असहायतेचा फायदाच घेतला. त्यामुळे त्यांनी स्वातीला या बंधनातून मोकळे करायचे ठरवले होते.

कोर्टात डिव्होर्सची तारीख सहा महिन्यानंतरची होती. काळजीने स्वाती पर कोमेजून गेली होती. शेवटी स्वातीच्या वडिलांनी स्वातीला काही दिवसांकरिता तिच्या आत्याकडे पाठवले. वातावरण बदलल्याने स्वातीमध्ये आता सकारात्मक बदल दिसून येत होता. स्वातीची आते बहीण तिच्याच वयाची होती आणि ती सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती त्यामुळे स्वातीच्या पुन्हा एकदा अभ्यासाला लागली.

स्वातीने स्वतःला अभ्यासात पूर्णपणे बुडवून घेतले. हळूहळू स्वातीचा आत्मविश्वास वाढला. तिने तिच्या आतेबहिणी सोबतच परीक्षेचा फॉर्म भरला आणि पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण होऊन चांगल्या नोकरीवर लागली. तिच्या आई वडिलांना खूप आनंद झाला. स्वाती आता तिच्या भूतकाळातून पूर्णपणे बाहेर आली होती.

तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या आत्मविश्वासाने तिचे सौंदर्य आणखीनच खुलवले होते. सहा महिन्यानंतर जेव्हा कोर्टात घटस्फोटाच्या कागदांवर स्वाक्षरी करायला स्वाती गेली तेव्हा अजय तिच्याकडे पाहतच राहिला. स्वातीचे राहणीमान अगदी बदलले होते. आत्मविश्वासाने तिचे सौंदर्य आणखीनच खुलले होते.

तिच्या नोकरीचे तर त्याला बरेच आधी कळले होते. आणि इतके दिवस एकट्याने राहून त्याला स्वातीची त्याच्या आयुष्यातील किंमत कळली होती. आता त्याला स्वाती त्याच्या आयुष्यात पुन्हा हवी होती. तसे त्याने मध्यस्ता करवी स्वातीच्या घरच्यांना कळवले होते पण स्वातीच्या बाबांनी ह्याला नकार दिला. आज कोर्टात अजय स्वतःहून स्वाती शी बोलायला आला.

” तुझ्या नोकरीबद्दल तुझे अभिनंदन…” अजय म्हणाला.

” धन्यवाद…” स्वातीने अगदी निर्विकारपणे उत्तर दिले.

” तुझी इच्छा असेल तर आपण आपल्या नात्याबद्दल पुन्हा एकदा विचार करू शकतो…कारण आज तुलासुद्धा चांगली नोकरी आहे…आज मी तुला चारचौघात मिरवू शकतो कारण तुझे स्वतःचे असे काही कर्तृत्व आहे…तू हो म्हणत असशील तर आपण घटस्फोट रद्द करू शकतो…” अजय स्वातीवर फार मोठे उपकार केल्याच्या आविर्भावात म्हणाला.

” मला तुमच्यासोबत पुन्हा एकत्र यायला अजिबात आवडणार नाही…आज फक्त मला चांगली नोकरी आहे आणि तुम्ही मला घेऊन मिरवू शकता म्हणून तुम्हाला मी पुन्हा तुमच्या आयुष्यात हवी आहे…नाती कर्तृत्व पाहून नाही तर प्रेमाने बनतात…मी तुम्हाला तुमच्या सर्व गुणदोषांसकट स्वीकारले होते त्यामुळे तुमच्याकडून सुद्धा मला तीच अपेक्षा होती…

माझे वडील तुमच्यासमोर मला नांदवण्यासाठी हात पसरत होते तेव्हा देखील तुम्ही मला झिडकारले… खरं तर मी माझ्या मनातून आणि आयुष्यातून तुम्हाला केव्हाच काढून टाकले आहे…आता फक्त कागदी सोपस्कार तेवढे बाकी आहेत…तुम्हाला फक्त एक विनंती आहे आता जेव्हा तुम्ही दुसरं लग्न कराल तेव्हा त्या मुलीला तुमच्या सगळ्या अपेक्षा आधीच सांगा जेणेकरून तिचे आयुष्य उद्धवस्त होणार नाही..” स्वाती म्हणाली.

अजयने हे ऐकताच तो रागाने पाय आपटत तेथून निघून गेला. थोड्याच वेळात कोर्टात दोघांच्या नावांचा पुकारा झाला आणि दोघांनीही घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या करून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली.

स्वातीच्या वडिलांनी स्वाती आणि अजयच्या नात्याचे भवितव्य अंधारात आहे हे ओळखून उशिरा का होईना घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि तिथूनच स्वातीच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली. कधीकधी भविष्याचा विचार करून वर्तमानात काही कठीण निर्णय घ्यावेच लागतात.

✍️ Aarti Lodam Kharbadkar…..

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: