पुण्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामें करण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुखांचे निर्देश
अतिवृष्टीमुळे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले आहेत.
शहरामध्ये पंचनामे करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकांमध्ये दोन महसूल विभागाचे अधिकारी आणि एक महापालिकेचा अधिकारी असणार आहे. जिल्ह्यातील सुमारे तीन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले असून, नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक बारामती येथे मागविण्यात आले आहे.
शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. या नुकसानग्रस्तांना लवकर मदत मिळावी, यासाठी पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘नुकसान झाल्यानंतर नागरिकांना वेळीच मदत मिळाली पाहिजे, यादृष्टीने सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना पंचमाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शहरी भागात महापालिकेचे अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक असणार आहे, तर ग्रामीण भागात महसूल विभागाचे अधिकारी हे पंचनामे करणार आहेत’