बदलेले जीवन आणि बदलती जीवनशैली अनेक आजारांना निमंत्रण देत आहे. आजकाल अनेक लोक डायबिटीजमुळे त्रासले आहेत. पूर्वीच्या काळी निरोगी आहारामुळे हा आजार क्वचित लोकांना असायचा. आजकाल आहारात चुकीच्या पदार्थांचा समावेश केल्याने देखील शरीरात साखरेचे प्रमाण वाढते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला डायबिटीज असेल तर या भाज्यांचा आहारात समावेश करा. अशा काही भाज्या आहेत ज्यामुळे तुमच्या शरीरातील शुगर लेवल नियंत्रणात राहायला मदत होते.
मधूमेह असणाऱ्यांसाठी ब्रोकोली आरोग्यदायी ठरते. सोबतच कच्च्या टोमॅटोचे सेवन केले तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायला मदत होते. मुळ्यात असलेल्या पोटॅशियमचे डायबिटीज पेशंटना अनेक फायदे होतात. मुळ्याचा रस करून किंवा त्याचे सूप, पराठे, सॅलड अशा रूपातही मुळ्याचं सेवन करता येतं.
दरम्यान, गाजरात भरपूर फायबर असतात त्यामुळे पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते शिवाय गाजरामुळे शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. हिरवा पालक देखील मधूमेह रूग्णांसाठी फायदेशीर आहे आणि यामुळे शरीरातील रक्तप्रवाह देखील सुधरतो. मात्र, कोणतेही घरगुती उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.