आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक, विचारवंत प्रा.विलासराव वाघ यांचे निधन
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक, विचारवंत आणि ‘सुगावा’ या लेखन चळवळीचे संस्थापक संपादक प्रा. विलास वाघ यांचे आज पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये कोरोना संसर्गाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी उषा वाघ आहेत.
पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे माजी अध्यासन प्रमुख असणारे विलास वाघ, हे वाघ सर या नावाने ओळखले जात. त्यांचा पुण्यातील आणि महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळी, संस्था आणि व्यक्तींचा मोठा संपर्क होता. सातत्याने सामाजिक न्यायाची भूमिका घेत त्यांनी फुले-आंबेडकरी चळवळीला मोठे योगदान दिले.
त्यांनी पुण्यातील अशोक विद्यालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे विद्यापीठाच्या प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागात काम केले. नंतर त्यांनी तळेगाव ढमढेरे येथे अनेक शैक्षणीक उपक्रम सुरू केले. सिद्धार्थ सहकारी बँकेच्या स्थापणेत त्यांचा मोठा सहभाग होता.आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह मंडळाची त्यांनी स्थापना केली होती.
स्वतःची भूमिका असलेला आणि वैचारिक भूमिका मांडणारा, आंबेडकरी चळवळीचा निष्ठावंत असा बुद्धिवादी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे.
‘सुगावा’द्वारे त्यांनी अनेक नवे लेखक तयार केले. अनेक कार्यकर्त्यांना लिहिते केले. रावसाहेब कसबे, सुखदेव थोरात, यशवंत मनोहर, उत्तम कांबळे अशा अनेकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.