देशात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

 

मुंबई | मगच्या काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल झाले आहेत. उत्तर भारतात गेली काही दिवस सलग तापमानात वाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची स्थिती निर्माण झाली असून ऐन हिवाळ्यात उत्तरेत बहुतांशी ठिकाणी ऊन, पाऊस, गारठा, धुके आणि हिमवृष्टी असं संमिश्र वातावरण नोंदलं गेलं आहे. त्यानंतर आता देशात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे.

पुढील तीन दिवसांत वायव्य भारतासह ईशान्य भारतात बहुतांशी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या चोवीस तासांत पंजाब, वायव्य उत्तर प्रदेश, बिहार, हिमालयातील काही प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि मेघालयात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमान समुद्र आणि आसपासच्या प्रदेशात नवीन अस्मानी संकट तयार होण्याची शक्यता आहे. २७ फेब्रुवारी रोजी या परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील २४ तासांत दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरासह दक्षिण अंदमान समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे २७ आणि २८ फेब्रुवारी दरम्यान अंदमान निकोबार बेटांवर सुसाट वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे.

Team Global News Marathi: